नाशिक येथे रस्त्यातील २ झाडे काढण्यावरून वाद !

प्रातिनिधिक छायाचित्र

नाशिक – येथे गंगापूर रस्त्यावर मध्येच असलेली २ प्रचंड मोठी वडाची झाडे अनेक अपघात होत असल्याने पाडली पाहिजेत, असे एका गटाचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर ही झाडे तोडण्याचे काम चालू झाले आहे. या झाडांमुळे रस्त्यात अपघात होत असून त्या गावातील एकमेव आधुनिक वैद्य असलेल्या व्यक्तीचा येथे अपघातात मृत्यू झाला होता. पर्यावरणप्रेमींचा ही झाडे पाडण्यास विरोध आहे. त्यामुळे त्यांनी तिथे झाडाखाली बसून आंदोलन केले.

‘हरिद लवादा’मध्ये येथील झाडे पाडण्याच्या संदर्भात सुनावणी होणार होती; परंतु ६ एप्रिलला याविषयीची सुनावणी झाली नाही. ‘शतायू वृक्ष तोडतांना आपल्या मुलांचा विचार करा’, असे वाक्य लिहिलेले फलक पर्यावरणप्रेमींनी हातात घेतले होते. सर्वाेच्च न्यायालयाचा झाडे न तोडण्याचा आदेश असूनही ४०० ते ५०० वर्षे जुनी झाडे तोडली जात आहेत. अपघात झाडांमुळे होत नसून येथे ‘कृत्रिम अडथळे’ (बॅरिकेड्स) न उभारणार्‍या महापालिकेमुळे होत आहेत, असे पर्यावरणप्रेमींनी माध्यमांना सांगितले.