वर्ष २०३५ पर्यंत ‘एस्.टी.’च्या सर्व बसगाड्या ‘इलेक्ट्रिक’ करणार !

राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा

प्रताप सरनाईक

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – वाढते प्रदूषण आणि इंधनाचे वाढते शुल्क लक्षात घेता राज्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र पालट करण्यात येणार आहेत. ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५’ अंतर्गत वर्ष २०३५ पर्यंत एस्.टी. महामंडळाच्या सर्व १४ सहस्र बसगाड्या पूर्णपणे ‘इलेक्ट्रिक (विजेवर चालणार्‍या) केल्या जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केली. २५ मार्च या दिवशी नियम २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर ते बोलत होते.

मंत्री प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर प्रत्येक २५ कि.मी. अंतरावर भारित (चार्जिंग) केंद्रे उभारली जातील. त्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यावर अधिक भर दिला जाईल. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी कर सवलती आणि पथकर माफी देऊन प्रवाशांचा प्रवास खर्च अल्प करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. इंधन आणि देखभाल यांच्या खर्चात मोठी बचत होऊन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यास साहाय्य होईल. ‘ई-मोबिलिटी’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यामुळे महाराष्ट्र या क्षेत्रात देशात अग्रस्थानी राहील.

याविषयी काँग्रेसचे आमदार भाई जगताप म्हणाले, ‘‘घोषणा चांगली असली, तरी कार्यवाहीसाठी आवश्यक निधी, भारित सुविधा आणि ग्रामीण भागांतील वीज उपलब्धतेचा ठोस आराखडा सरकारने मांडावा.’’