जाती-पाती पलीकडे जाऊन केवळ हिंदु म्हणून संघटित होणे काळाची आवश्यकता ! – डॉ. शुभम कुशे

राजापूर – शहरात ‘हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान’च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास पाळण्यात आला. त्याची सांगता १८ मार्च या दिवशी शहरातील श्री देव चव्हाटा मंदिर येथे करण्यात आली. या वेळी डॉ. शुभम कुशे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

डॉ. शुभम कुशे म्हणाले की,

१. औरंगजेबाच्या आदेशाने छत्रपती संभाजी महाराज यांना अनेक दिवस अनन्वित छळ करून मारण्यात आले. महाराजांनी हे सर्व छळ स्वाभिमानाने धर्मासाठी सोसले; परंतु शेवटपर्यंत हिंदु धर्माचा त्याग केला नाही. त्यामुळे त्यांच्या त्यागाला खरी आदरांजली म्हणून प्रत्येक हिंदूने आता जाती-पाती पलीकडे जाऊन केवळ हिंदु म्हणून संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे.

२. त्या काळात आपल्या या हिंदु राजाने जो पराक्रम गाजवला, त्याने औरंगजेबाची झोप उडाली होती आणि ९ वर्षांत स्वराज्याच्या केसालाही धक्का लावू न शकल्यामुळे  छत्रपती संभाजी महाराजांबद्दल औरंगजेबाच्या मनात प्रचंड भीती होती अन् रागही होता. दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराजांना दगाफटका झाला आणि ते पकडले गेले.

३. छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाचा आपल्यासमोर आदर्श आहे; परंतु दुर्दैवाने अलीकडच्या काळात काही राजकीय स्वार्थामुळे आपल्या आदर्श आणि पराक्रमी राजाबद्दल जाणीवपूर्वक अपप्रचार केला गेला, त्यामुळे त्यांचा खरा इतिहास  समजण्यामध्ये संभ्रम निर्माण केला गेला. या राजाकडून आपण काय शिकलो ? त्याच्या ऋणातून आपण कसे मुक्त होणार ? आजही हिंदु धर्मियांसमोर पुनश्च अनेक संकट ‘आ’ वासून उभी आहेत. आजही परिस्थिती फार वेगळी नाही.

४. आजूबाजूच्या परिस्थितीचा डोळे उघडे ठेवून जर अभ्यास केला, तर पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांची धर्मनिष्ठा आणि स्वराज्यनिष्ठा आपल्याला आदर्श मानून जागे रहायला लागेल.