निष्क्रीय सज्जन शक्तीमुळे देशाची हानी झाली ! – ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाघ

अकोला येथे ‘विशाल हिंदु संमेलन’ !

अकोला, १५ मार्च (वार्ता.) – निष्क्रीय सज्जन शक्तीमुळे देशाची पुष्कळ हानी होत आहे. आजच्या काळात रामराज्य पुन्हा आणण्यासाठी भरतासारखा त्याग अंगी बाणवणे आणि छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यासाठी प्रत्येक मातेने जिजाऊ होणे आवश्यक आहे. केवळ विद्वत्ता असून चालणार नाही, तर विवेक जागृत असणे ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाघ (वारी भैरवगड) यांनी केले. येथील न्यू तापडियानगर भागातील श्री गजाजन महाराज मंदिराच्या प्रांगणात ‘सकल हिंदु समाज’ आयोजित ‘विशाल हिंदु संमेलना’त ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

हिंदुविरोधी कारवाया आणि वैचारिक प्रदूषण यांविरुद्ध संघटित व्हा ! – अधिवक्त्या (श्रीमती) श्रुती भट, सनातन संस्था

सध्या भारतात धर्मांधांच्या हिंदुविरोधी कारवाया वाढल्या आहेत, तसेच तथाकथित पुरोगामी विचारवंतांमुळे होणार्‍या वैचारिक प्रदूषणामुळे हिंदु संस्कृतीवर आघात होत आहेत. यावर उपाय म्हणून आठवड्यातून एकदा एकत्र येऊन धर्मावरील आघातांवर चर्चा केली पाहिजे आणि संघटित झाले पाहिजे.

संघाचे अकोला महानगर बौद्धिक प्रमुख श्री. प्रवीण साळुंके यांनी भारतमातेला विश्वगुरुपदी नेण्यासाठी सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वबोध आणि नागरी कर्तव्य ही ‘पंचसूत्री’ विशद केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सनातनचे साधक श्री. संजय ठाकूर यांनीही त्यांचे हिंदुत्वनिष्ठ विचार मांडले. कार्यक्रमाचा प्रारंभ गणेशवंदनेने, तर सांगता ‘वन्दे मातरम्’ने झाली.

या संमेलनाला संघ परिवाराचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथ आणि सात्त्विक वस्तू प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.