करनूर (ता. कागल) येथे घडलेल्या दगडफेकीच्या घटनेला कारणीभूत धर्मांध दोषींवर कठोर कारवाई करा !

हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे निवेदन

जिल्हाधिकारी अमोल येडगे (उजवीकडे) यांना निवेदन देताना हिंदुत्ववादी

कोल्हापूर – करनूर (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाच्या निमित्ताने हिंदु समाज ‘बलीदान मास’ पाळत असतांना काही धर्मांधांनी दगडफेक करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. ही घटना अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. यापूर्वी हेर्ले, कुंभोज आणि कबनूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेले भित्तीपत्रक फाडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे. करनूर येथील घटनेतील धर्मांधांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि या घटनांमागील सूत्रधारांचे अन्वेषण करून त्यांच्यावरही कारवाई करावी, या मागणीसाठी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. (असे निवेदन का द्यावे लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई केव्हा करणार ? – संपादक)

या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, हिंदु महासभा राज्य संघटक श्री. मनोहर सोरप, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री विश्वास पाटील, शशी बीडकर, सोमनाथ शिवणगेकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. महेंद्र अहिरे, हिंदु महासभा महिला शहराध्यक्ष सौ. पूजा शिंदे, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरेकर, उद्योजक श्री. प्रसन्न शिंदे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे उपस्थित होते.

या प्रसंगी करण्यात आलेल्या अन्य मागण्या

  • जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कोणताही जिहादी कट असल्यास तो उघडकीस आणावा.
  • भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

संपादकीय भूमिका

राष्ट्रपुरुष आणि देवता यांच्याशी संबंधित कार्यक्रम अन् मिरवणुका यांवर दगडफेक करणार्‍या धर्मांधांवर कारवाई केव्हा होणार ?