सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचा १२ मार्चला मोर्चा

कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आंबा आणि काजू पिकांची मोठी हानी झाली आहे. या हानीची भरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यातील शेतकरी तथा आंबा, काजू बागायतदार १२ मार्च या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. याविषयी पालकमंत्र्यांना चुकीची माहिती दिली जात असून आंबा बागायतदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी चेतावणी आंबा बागायतदार, तसेच जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांनी दिली आहे.
कुडाळ एम्.आय.डी.सी. येथे ९ मार्च या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत गावडे बोलत होते. या वेळी काका ढोके, किरण टेंभूलकर, गणेश गावकर, प्रशांत तेली, पिंटू गावडे, रतन तेली, पांडुरंग गावडे, विजय सरनोबत आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा हा आंबा उत्पादक जिल्हा आहे. यावर्षी आंबा बागायतदार चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेत होते; मात्र वातावरणातील पालटामुळे आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात जळून गेला. त्यामुळे यंदा केवळ ५ ते १० टक्केच उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. आंबा बागायतदारांसह या व्यवसायावर अवलंबून असलेले अनेक लोकही चिंतेत आहेत. एकूणच कोकणातून हापूस आंब्याचे अस्तित्व धोक्यात येईल का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे गावडे यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे आम्ही प्रत्येक वेळी हानीभरपाई मागत नाही; मात्र तेथील लोकप्रतिनिधी शेतकर्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहातात, अशी परिस्थिती आमच्याकडे नाही. यावर्षी सरकारने आंबा बागायतदारांना आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी त्यांनी केली.
पालकमंत्र्यांची मोर्चा दडपून टाकण्याची भाषा ! – उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, कणकवली
याविषयी कणकवली येथे पत्रकारांशी बोलतांना युवासेना जिल्हाप्रमुख तथा कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक म्हणाले, ‘‘गेल्या महिनाभरापासून बागायतदार हानीभरपाईसाठी सातत्याने मागणी करत आहेत; मात्र शासनाकडून कोणताही निर्णय होत नाही. त्यामुळे शेतकरी आणि बागायतदार यांच्यामध्ये असंतोष वाढत आहे. देवगडमधून या आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. त्याला सर्व पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. १२ मार्च या दिवशी मोर्चा काढण्यात येणार आहे. शासनाच्या विरोधात प्रचंड मोर्चा निघणार हे समजताच पालकमंत्री आंबा बागांची पहाणी करण्याचे नाटक करत आहेत. एवढेच नव्हे, तर मोर्चा दडपून टाकण्याची भाषा बोलत आहेत.’’
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !