पुढील ६ महिने युद्धाचे महासंकट ! – प्रसिद्ध ज्योतिषी सिद्धेश्‍वर मारटकर

विविध स्तरांतील संकटांमुळे जगभरात अस्थिरता निर्माण होणार !

प्रसिद्ध ज्योतिषी सिद्धेश्‍वर मारटकर

पुणे – ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे जागतिक स्तरावर युद्ध पेटले आहे. हे संकट पुढील ६ महिने तरी टळण्याची चिन्हे नाहीत. विशेषतः १९ मार्चपर्यंत युद्धाची तीव्रता वाढणार असून ‘सप्टेंबरपर्यंत जागतिक परिस्थिती अत्यंत अस्थिर राहील’, असे स्पष्ट संकेत प्रसिद्ध भविष्यवेत्ते सिद्धेश्‍वर मारटकर यांनी दिले आहेत. मारटकर यांनी दिलेल्या विश्‍लेषणानुसार मार्च महिन्यात झालेल्या ग्रहणांचे परिणाम पुढील ६ महिने जाणवणार आहेत.

मारटकर यांनी ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेल्या भविष्यातील घटना !

१. अमेरिका, इराण, इस्रायल, युरोप आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडली आहे. चीनचा इराणला पाठिंबा आणि दुसरीकडे पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष यांमुळे हे युद्ध जागतिक स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे.

२. जगातील मोठ्या पदांवरील व्यक्ती आणि राष्ट्रप्रमुख यांच्यावर प्राणघातक आक्रमणे होणे, त्यांना पदत्याग करावा लागणे, तसेच त्यांच्या अपघाती मृत्यूचे योग जुळून येत आहेत.

३. केवळ युद्धच नव्हे, तर नैसर्गिक आणि आर्थिक स्तरांवरही भीषण संकटे येणार आहेत.

४. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांना त्रास होईल. यामुळे अनेक देशांत अराजक माजेल आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतील.

५. जागतिक व्यापार विस्कळीत झाल्यामुळे शेअर बाजार कोसळेल; मात्र या काळात सोने-चांदीच्या दरांत मोठी वाढ होणार आहे.

६. भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवर महाभयंकर वादळे, तर उत्तर भारतात भूकंपाचे हादरे बसण्याची शक्यता आहे. वायूगळती, रासायनिक आस्थापनांमधील स्फोट आणि विमान दुर्घटना यांंमुळे जीवितहानी होऊ शकते.

७. भारताच्या पत्रिकेतील ग्रहस्थितीनुसार देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. या काळात शेजारी देशांत हिंसाचार, जाळपोळ, स्फोटक घटना घडू शकतात. चलन पालटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

८. देशातील ज्येष्ठ किंवा महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचे अपघात, मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. उच्च पदावरील व्यक्तींचे त्यागपत्र आणि निवृत्तीच्या घटना संभवतात. ग्रहणामुळे धार्मिक-जातीय वाद शक्य असून मोठ्या नेत्यांवर आक्रमणे होतील.

संपादकीय भूमिका

‘सनातन प्रभात’ने गेल्या अनेक वर्षांपासून येणार्‍या महाविनाशकारी आपत्काळाविषयी ‘जनतेने पूर्वसिद्धता कशी करावी ?’ याविषयीच्या लेखमालिका प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे जनतेने स्वत:चे आणि स्वत:च्या कुटुंबियांचे रक्षण होण्यासाठी आतातरी आध्यात्मिक साधना वाढवणे आवश्यक आहे !