Hindu Janajagruti Samiti : महिलांचा सन्मान करता येत नसेल, तर अवमान तरी करू नका !

  •  ‘एंगेज्ड २’ या ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या आयोजकांना हिंदु जनजागृती समितीने सुनावले

  • कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्‍वासन !

‘रिअ‍ॅलिटी शो’च्या विरोधात गृहराज्यमंत्री योगेश कदम (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार

मुंबई – जिओ हॉटस्टार या ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार्‍या ‘एंगेज्ड २ रोका या धोका’ या ‘रिअ‍ॅलिटी शो’मधून (कोणत्याही संहितेविना बनवण्यात आलेल्या कार्यक्रमातून) दाखवली जाणारी अश्‍लीलता आणि होणारी महिलांची विटंबना यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांना निवेदन दिले. निवेदनात ‘रिअ‍ॅलिटी शो’वर तात्काळ बंदी घालण्याची आणि संबंधितांवर गुन्हे नोंदवण्याची मागणी करण्यात आली.

दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असतांना अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांचे केले जाणारे अश्‍लील सादरीकरण लाजिरवाणे असून यातून महिलांवरील अत्याचारांना प्रोत्साहनच मिळेल. महिलांचा सन्मान राखता येत नसेल, तर अवमान तरी करू नका, असे ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या आयोजकांना हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. प्रियांका लोणे यांनी सुनावले. समितीच्या मागणीची गंभीर नोंद घेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ‘या प्रकरणी पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश देण्यात येतील, तसेच या संदर्भात कारवाई करण्यासाठी सांस्कृतिक विभागालाही कळवले जाईल’, असे आश्‍वासन दिले.

डिजिटल माध्यमांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य सरकारने ‘सांस्कृतिक देखरेख समिती’ गठीत करावी. महाराष्ट्राची संस्कृती आणि स्त्री-सन्मान यांची परंपरा जपण्यासाठी अशा विकृत कार्यक्रमांना थारा दिला जाणार नाही, अशी चेतावणी समितीने दिली आहे. ‘२४ घंट्यांच्या आत ठोस कारवाई करावी’, अशी मागणी समितीने गृहराज्यमंत्र्यांकडे केली.

निवेदनात म्हटले आहे की…,

१. ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये ‘लॅप डान्स’ (मांडीवर बसून नृत्य करणे), ‘मड टास्क’ (चिखल लावणे) आणि ‘आइस क्यूब टास्क’ (बर्फाच्या तुकड्यासमवेत खेळणे) यांसारख्या अत्यंत हीन दर्जाच्या कृत्यांद्वारे महिलांचा वस्तूप्रमाणे वापर केला जात आहे.

२. तोंडाने महिलांचे वस्त्र काढणे, सार्वजनिकरित्या महिलांना हाताने स्पर्श करून आंघोळ घालणे, अंगाला चिखल लावणे आदी कृत्ये कायद्याचे उघडपणे उल्लंघन करणार्‍या आहेत. या कृत्यांमुळे युवा पिढीवर विपरीत परिणाम होत असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चालू असलेला हा स्वैराचार रोखणे काळाची आवश्यकता आहे.

अश्‍लील साहित्यावर कायमस्वरूपी निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लोकप्रतिनिधींचे आश्‍वासन

विषयाचे गांभीर्य ओळखून भाजपच्या आमदार सौ. चित्रा वाघ आणि शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. विधान मंडळात हे सूत्र उपस्थित करून ‘अशा अश्‍लील साहित्यावर कायमस्वरूपी निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न केले जातील’, असे लोकप्रतिनिधींनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • अशा प्रकारे महिलांचा अश्‍लाघ्य अनादर करणार्‍या कार्यक्रमांवर महिलाधिकार कार्यकर्त्या आणि संघटना गप्प का आहेत ? यातून महिलाधिकार हा केवळ एक दिखाऊपणा आहे का, असे समजायचे का ?
  • सरकारने खरेतर अशा कार्यक्रमांवर स्वत:हूनच कारवाई केली पाहिजे !