दैनिक ‘सनातन प्रभात’चा नाशिक येथील वर्धापनदिन अभूतपूर्व उत्साहात आणि भावविश्वात डुंबवणारा सोहळा !

नाशिक, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील शंकराचार्य न्यास संकुल, डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे २२ फेब्रुवारी या दिवशी दिवशी झालेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा २६ वा वर्धापनदिन सोहळा अभूतपूर्व उत्साहात आणि भावविश्वात डुंबवणारा असा झाला. या सोहळ्यासाठी नाशिक येथील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत, तसेच कुंभमेळा आयोजन समितीचे अध्यक्ष पू. भक्तीचरण दासजी महाराज, भाजपच्या नगरसेविका सौ. स्वाती भामरे, डॉ. किशोर गांगुर्डे, पुरोहित महासंघाचे श्री. सतीश शुक्ल यांसह हिंदुत्वनिष्ठ, अन्य दैनिकांचे संपादक आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

‘सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या अमूल्य मार्गदर्शनातून दिशा मिळाली’, असे वाचकांनी या वेळी आवर्जून सांगितले.

वाचकांचे मनोगत

बांगलादेशासह जागतिक पातळीवर हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांची वृत्ते दैनिकातून कळतात ! – श्रीकृष्ण साठे, उद्योजक

प्रतिदिन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जो संदेश असतो, तो दिशादर्शक आणि विचारप्रवण करणारा असतो. बांगलादेशसह जागतिक पातळीवर हिंदुत्वाच्या संदर्भातील विशेषकरून हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराची वृत्ते दैनिकातून कळतात, जी अन्य कुठे वाचायला मिळत नाहीत. गेल्या दोन दिवसांपासून मला वाटणारी अस्वस्थता ‘सनातन प्रभात’ शेजारी ठेवून झोपल्यावर नाहीशी झाली आणि शांत वाटले.

धर्म आणि देश यांचा विचार करणारे एकतरी दैनिक आहे, याविषयी अभिमान वाटतो ! – डॉ. किशोर गांगुर्डे

अन्य दैनिकात हिंदु धर्माच्या बाजूने कुणी विशेष लिहीत नाही आणि बहुतांश लिखाण हे हिंदु धर्माच्या विरोधात असते. याउलट ‘सनातन प्रभात’ वाचणे चालू केल्यावर खरे वृत्त कसे असायला हवे ? ते कळले. ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्दही लिहिण्यास अन्य प्रसारमाध्यमे कचरतात. देवाचे वर्तनमानपत्र म्हणून आम्ही ‘सनातन प्रभात’ दैनिक घेतो. धर्म आणि देश यांचा विचार करणारे ‘सनातन प्रभात’सारखे एकतरी दैनिक आहे, याविषयी अभिमान वाटतो.