गडकिल्ल्यांची स्वच्छता-संवर्धन मोहीम लोकमंत्र व्हावा ! – सिद्धेश कदम

‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची विशेष जनजागृती मोहीम

दापोली – युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेल्या राज्यातील ११ गडकिल्ल्यांच्या स्वच्छता, संवर्धन आणि जतन यांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ ही विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर किल्ले सुवर्णदुर्ग, हर्णे येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

या मोहिमेच्या शुभारंभात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी राज्यातील युनेस्कोने दर्जा दिलेल्या ११ गडकिल्ल्यांची स्वच्छता, संवर्धन आणि जतन ही मोहीम हा लोकमंत्र होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ‘मानाचा मुजरा हटवूया कचरा’ या मोहिमेचा जनजागृती उपक्रम हा राज्यातील अन्य किल्ल्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम्. देवेंदर सिंह,  जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम हे उपस्थित होते.

१. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून युनेस्कोने दर्जा दिलेल्या ११ गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राबवली जाणार आहे.

२. या ऐतिहासिक किल्ले पहाण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. पर्यटक किल्ल्यांना भेट देत असतांना त्यांच्या समवेत असणार्‍या पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, खाण्याचे सामान प्लास्टिक वेष्टने यांमुळे किल्ल्यांवर कचर्‍याची मोठी समस्या भेडसावत असते.

३. किल्ल्यांची स्वच्छता करण्यासाठी परिसरातील शिवप्रेमी आणि सामाजिक संस्था नेहमीच स्वच्छता मोहिमेचे आयोजन करून या गडांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करत आहेत.

४. राज्यातील या ११ गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम ही त्या परिसरातील स्थानिक सामाजिक संस्थेच्या सहकार्याने संपूर्ण वर्षभर आयोजित केली जाणार आहे. त्याकरता त्या संस्थेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आर्थिक अनुदानसुद्धा देण्यात येणार आहे.