‘द केरल स्टोरी-२’सारख्या विद्वेषी चित्रपटांना प्रदर्शित करण्यास अनुमती कशी दिली जाते ?’ – Pinarayi Vijayan

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांचा प्रश्‍न

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन्

थिरूवनंतपूरम् (केरळ) – ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. पहिला चित्रपट जाणूनबुजून निर्माण करण्यात आला होता, ज्यातून केरळविरोधी द्वेष पसरवण्याचा आणि राज्यातील सर्व धर्मांचा सन्मान करणार्‍या संस्कृतीला दुर्बल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजात फूट आणि द्वेष निर्माण करणारे असे विषारी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यास अनुमती कशी दिली जाते ? असा प्रश्‍न केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत विचारला. वर्ष २०२२ मध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला होता. यात हिंदु तरुणींना ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवून त्यांना आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी करण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. तेव्हाही या चित्रपटाला विरोध करण्यात आला होता. आता याचा दुसरा भाग येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन असून विपूल शहा निर्माते आहेत.

मुख्यमंत्री विजयन् यांनी मांडलेली सूत्रे –

१. संघ परिवाराने या चित्रपटातील कथानकाला पुढे नेऊन प्रसार केला. परस्पर संमतीने झालेल्या विवाहांनाही बलपूर्वक धर्मांतर आणि धर्मांधता यांचे उदाहरण म्हणून दाखवले जात आहे. (अशा प्रकारे मोघम बोलून स्वत:चे कथानक पुढे रेटणार्‍या विजयन् यांच्या विरोधात संपूर्ण हिंदु समाजाने उभे रहाणे आवश्यक ! – संपादक)

२. केरळमध्ये कधीही धार्मिक दंगली झालेल्या नाहीत, येथे सर्व समाजघटक परस्पर सन्मान राखतात. (मोपला दंगल कुणी आणि का केली ? त्याचा परिणाम काय झाला, हे विजयन् का सांगत नाहीत ? – संपादक) त्यामुळे काही जण केरळकडे पाहून मत्सर बाळगतात आणि राज्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात.

३. केरळला आतंकवादाचे केंद्र म्हणून दाखवण्याच्या प्रयत्नांना आपण सर्वांनी एकत्रितपणे नकार दिला पाहिजेे. केरळ हे धार्मिक सौहार्द असलेले राज्य आहे, येथे स्थिर प्रगती होत आहे आणि कायदा अन् सुव्यवस्था चांगली आहे. (मुसलमानबहुल मल्लपूरम् जिल्ह्यात हिंदूंची काय स्थिती आहे, हे संपूर्ण देशाला ठाऊक आहे ! – संपादक)

४. या खोट्या प्रचारामुळे राज्यातील सर्व धर्मांचा सन्मान करणार्‍या संस्कृतीच्या पायाला धक्का लागू नये, हे आपले सामूहिक दायित्व आहे. धर्मनिरपेक्षता आणि बंधुत्व यांच्या मूल्यांना बळकटी देऊन या असत्य दाव्यांना प्रत्युत्तर द्यावे, असे त्यांनी आवाहन केले.