श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर देशभरात १ लाख कोटी रुपयांची उलाढाल ! – Shri Ram Mandir Turnover

‘आय.आय.एम्. लखनऊ’चा अहवाल प्रसारित

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येच्या अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक वाढ पहायला मिळत आहे. ‘आय.आय.एम्. लखनऊ’ या प्रतिष्ठित विश्वविद्यालयाने एक अभ्यास अहवाल प्रसारित केला आहे. ‘दी इकॉनॉमिक रेनेसॉन्स ऑफ अयोध्या, इंडिया – ए केस स्टडी ऑन राममंदिर’ नावाच्या या अहवालात श्रीराममंदिरामुळे पर्यटनाधारित वार्षिक उलाढाल १०० अब्ज रुपयांच्या घरात पोचणार आहे. तसेच देशभरातील आर्थिक उलाढाल ही १ लाख कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मंदिर उभारणीपूर्वी अयोध्येची ओळख प्रामुख्याने पवित्र तीर्थक्षेत्रापुरती मर्यादित होती; परंतु प्राणप्रतिष्ठेनंतर येथे आर्थिक हालचालींमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे.

अहवालातील महत्त्वपूर्ण सांख्यिकीय विश्लेषण असे… !

१. पर्यटन, गुंतवणूक, रोजगार आणि महसूल यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ

२. पुढील ४-५ वर्षांत पर्यटन, वाहतूक आणि आतिथ्य क्षेत्रांत अनुमाने १ लाख २० सहस्र प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीची शक्यता

३. प्रतिदिन २ लाखांहून अधिक भाविक घेतात दर्शन, वर्षाकाठी ५-६ कोटी भाविक अयोध्येची यात्रा करतात.

४. स्थानिक हस्तकला, धार्मिक स्मृतीचिन्हे आणि मूर्तींच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने कारागीर अन् स्थानिक उत्पादक यांना थेट लाभ

५. अनुमाने ६ सहस्र सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रारंभ

६. दुकानदार आणि फिरते विक्रेते यांच्या दैनंदिन उत्पन्नात पाच पटींनी वाढ

संपादकीय भूमिका

  • हिंदूंची मंदिरे आणि अध्यात्म यांचा द्वेष करणारे अन् आर्थिक सुबत्तेसाठीच प्रयत्न करण्याचा उपदेश पाजणारे उपटसुंभ पुरो(अधो)गामी यांना या अहवालावरून आता हिंदूंनी जाब विचारला पाहिजे !
  • श्रीराममंदिराच्या उभारणीतून ऐतिहासिक आर्थिक वाढ होत असतांना अयोध्येतील सात्त्विकता, चैतन्य, धार्मिकता आदींचे जतन अन् संवर्धन याकडे प्रशासनाचे लक्ष आहे का ? संत असणारे योगी आदित्यनाथ यांनी यातही लक्ष घालावे, अशी धर्मप्रेमी हिंदूंना अपेक्षा आहे !