Bangladesh Election : फाशीची शिक्षा ठोठावलेले ३ नेते झाले खासदार : बांगलादेशातील लोकशाहीची ऐशीतैशी !

  • आतंकवाद अथवा नरसंहार या कृत्यांत होते दोषी

  • भारतविरोधी मानसिकता

(डावीकडून) लुत्फोज्जामन बाबर, अब्दुस सलाम पिंटू व एटीएम अजहरुल इस्लाम

ढाका (बागंलादेश) – बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ने बहुमत मिळवून सत्ता पुनर्स्थापित केली आहे. तथापि मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेले काही दोषीही आता खासदार म्हणून संसदेत निवडून आले आहेत. या सूचीत ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’चे नेते लुत्फोज्जामन बाबर, अब्दुस सलाम पिंटू आणि अजहरुल इस्लाम यांचा समावेश आहे. ते तिघेही किमान १ लाख मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत.

१. लुत्फोज्जामन बाबर : यांनी नेत्रकोना-४ मतदारसंघातून १ लाख ६० सहस्रांहून अधिक मतांनी विजय मिळवला. वर्ष २००१ ते २००६ या कालावधीत खालिदा झिया सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते. वर्ष २००४ मध्ये ढाका येथे झालेल्या ग्रेनेड आक्रमणाच्या प्रकरणात हात असल्यावरून वर्ष २०१४ मध्ये त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या आक्रमणात शेख हसीना यांना लक्ष्य करण्यात आले होते. यामध्ये २३ जणांचा मृत्यू झाला होता. (गृहराज्यमंत्री पदावरील व्यक्ती जेव्हा विरोधी पक्षनेत्यावर अशा प्रकारे आक्रमण करते, यातून बांगलादेशातील लोकशाहीची २० वर्षांपूर्वीच किती दुरवस्था झाली होती, हे लक्षात येते ! – संपादक) पुढे वर्ष २०१८ मध्ये चितगाव शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात त्यांना आणखी एक मृत्यूदंड ठोठावण्यात आला होता. त्यांनी ईशान्य भारतातील बंडखोरांसाठी १० ट्रक शस्त्रास्त्रे मागवली होती. तथापि जानेवारी २०२५ मध्ये उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. (स्वत:च फाशी ठोठावयाची आणि नंतर निर्दाेष मुक्त करायचे ? न्यायव्यवस्थेसंदर्भात यापेक्षा दुसरा मोठा विनोद कोणता असेल ? – संपादक)

२. अब्दुस सलाम पिंटू : ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’चे आणखी एक प्रभावी नेते अब्दुस सलाम पिंटू यांनी टांगैल-२ मतदारसंघातून अनुमाने २ लाख मतांनी विजय मिळवला. वर्ष २००४ च्या ग्रेनेड आक्रमणात सहभाग असल्यावरून त्यांना वर्ष २०१६ मध्ये मृत्यूदंड सुनावण्यात आला होता. अब्दुस यांचा पाकची आतंकवादी संघटना ‘हरकत-उल्-जिहाद-अल्-इस्लामी’ला पाठिंबाही आहे. याच संघटनेवर भारतातील वाराणसी न्यायालयात वर्ष २००६, अजमेर शरीफ दर्गा २००७ आणि देहली येथे वर्ष २०११ मध्ये स्फोट घडवून आणल्याचा आरोप आहे. डिसेंबर २०२५ मध्ये अब्दुस यांना कारागृहातून सोडण्यात आले.

३. एटीएम अजहरुल इस्लाम : यांनी रंगपूर-२ मतदारसंघातून १ लाख ३९ सहस्र मतांनी विजय मिळवला. वर्ष १९७१ च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या वेळी १ सहस्र २५६ जणांची हत्या आणि १३ महिलांवर अत्याचार केल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर होते. वर्ष २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने या युद्ध गुन्ह्यांप्रकरणी त्यांना मृत्यूदंड ठोठावला होता.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेश यापुढे भारतासाठी भूराजकीयदृष्ट्या अधिकच आव्हानात्मक ठरू शकतो. अशा नेत्यांमुळे बांगलादेशातील भारतविरोधी साखळ्या पुन्हा सक्रीय होऊ नयेत, यासाठी भारताने व्यूहरचना आखणे आवश्यक !
  • भारतविरोधी मानसिकता असलेल्या बांगलादेशातील राजकीय नेत्यांचा एवढ्या मताधिक्याने विजय होणे, यातून ‘बांगलादेशी जनताही भारतविरोधीच आहे’, असेच म्हटले पाहिजे !