चीनच्या विद्वानांनी ‘भगवद्गीते’स  संबोधले ज्ञानाचे अमृत !

।। श्रीराम समर्थ ।।

श्री. विद्याधर नारगोलकर

चीनच्या विद्वानांनी ‘भगवद्गीतेस ज्ञानाचे अमृत आणि भारतीय संस्कृतीचा संक्षिप्त इतिहास’, असे संबोधले. भगवद्गीतेचा गौरव करतांना ते म्हणाले, ‘भगवद्गीता आधुनिक जगातील लोकांच्या आध्यात्मिक आणि भौतिक संकटांवरील उपायांचा स्रोत आहे.’ ‘भारतीय तत्त्वज्ञान परंपरांचा संगम’ नावाच्या परिसंवादात त्यांनी हे विचार मांडले. हा कार्यक्रम चीनमधील बीजिंग शहरात भारतीय दूतावासाने आयोजित केला होता.

याचे सर्व श्रेय आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना जाते; कारण ते वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यावर त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि विचारणा केली, ‘आपल्या देशात विश्वातील अनेक देशांच्या महत्त्वाच्या व्यक्ती भेटण्यास येतात, तेव्हा आपल्या राष्ट्राच्या वतीने त्यांना काय भेट दिली जाते ? त्याचे उत्तर त्यांना मिळाले की, आपण प्रेमाचे प्रतीक म्हणून ताजमहालची प्रतिकृती भेट देतो.’ हे ऐकल्यावर मोदींनी स्वत:ची नापसंती दर्शवत सांगितले, ‘‘यापुढे आलेल्या प्रत्येक व्यक्तीस भेट म्हणून ‘भगवद्गीता’ द्यावी आणि त्याचसमवेत जगातील सर्व भाषांमध्ये गीतेच्या आवृत्ती काढून त्या देण्यासाठी राष्ट्रपती भवनात ठेवण्याची व्यवस्था करावी. तेव्हापासून राष्ट्रपती भवनातून आपल्या देशाचे प्रतीक म्हणून ‘भगवद्गीता’ देण्यास आरंभ झाला. पंतप्रधान मोदी जेव्हा इतर देशांच्या दौर्‍यास जातात, तेव्हा ते तेथील राष्ट्रप्रमुखाला ‘भगवद्गीता’च भेट देतात.

आपल्या संस्कृतीत रुद्राक्ष आहे. त्या वृक्षास १२ वर्षांनी फळ येते आणि ते पवित्र असून भारतीय व्यक्ती ते आदराने स्वत:च्या गळ्यात घालते. त्याचप्रमाणे आदरणीय मोदी यांनी चालू केलेल्या या ‘गीता यज्ञा’स १२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे फळ म्हणून चीनसारखा साम्यवादी देश गीता कंठस्थ करत आहे. गीतेप्रमाणेच मोदींसारखा दूरदृष्टी असणारा नेता आपल्याला लाभला आहे, हे आपले भाग्य आहे. अशीच कार्ये त्यांच्या हातून घडण्यासाठी त्यांना श्रीकृष्णाने त्यांना उदंड आयुष्य द्यावे, हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना.

– श्री. विद्याधर नारगोकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।