India Suspends Indus Water : पाकिस्तानला जाणारे सिंधूचे पाणी थांबवले जाईल ! – केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर्. पाटील

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर्. पाटील यांनी दिली माहिती

जयपूर (राजस्थान) – सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला दिले जाणार नाही. पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबवून भारताच्या हितासाठी वापरले जाईल. या पाण्याचा लाभ हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि देहली राज्यांना मिळेल. या संदर्भात केंद्र सरकारकडून कार्ययोजना सिद्ध केली जात आहे. पाकिस्तानकडे जाणारे पाणी वळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सिद्ध करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर्. पाटील यांनी येथे दिली.

पाटील यांनी असेही सांगितले की, यमुना जल प्रकल्पाचे काम वेगाने केले जाईल, जेणेकरून पाण्याच्या चांगल्या व्यवस्थापनामुळे आणि वापरामुळे राज्यांना अधिक लाभ मिळू शकेल. यमुनेच्या पाण्यावर राजस्थानचा हक्क होता; पण मागील सरकारांनी या दिशेने ठोस प्रयत्न केले नाहीत. आता हरियाणा आणि राजस्थान सरकारमध्ये प्रकल्प अहवाल सिद्ध करण्यावर सहमती झाली आहे. लवकरच या प्रकल्पावर काम प्रारंभ होईल.
जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याच्या या योजनेचा अनुमानित खर्च ७७ सहस्र कोटी ते १ लाख कोटी रुपये असू शकतो. सध्या राजस्थानकडे सर्वांत अल्प पाणी आहे; पण येत्या काळात राजस्थानकडे सर्वाधिक पाणी असेल.