जीवनात सततचा आनंद अनुभवण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक

खोंडे (खेड) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन

मार्गदर्शन करतांना सद्गुरु सत्यवान कदम

खेड, २१ जानेवारी (वार्ता.) – आजकाल बहुतेक जण दैनंदिन जीवनातील कटकटी, धावपळ, समस्या आदींमुळे त्रासलेले असतात. दिवसभरात प्रत्येकाची जी धडपड असते, ती सततचे सुख मिळवण्यासाठी असते; मात्र मनुष्य पंचज्ञानेंद्रिये यांच्या माध्यमातून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, यासाठी  आवडती वस्तू खाणे, नवीन कपडे खरेदी करणे, आवडत्या ठिकाणी फिरायला जाणे, आवडता छंद जोपासणे, यातून तो मनातील निराशा, दुःख टाळण्याचा प्रयत्न करतो आणि सुखी रहाण्याचा प्रयत्न करतो; मात्र अशा प्रयत्नांतून मिळणारे सुख तात्पुरते असते.

सततच्या टिकणार्‍या सुखाला आनंद म्हणतात. आनंद कसा मिळवायचा ? हे कुठेही शाळा-महाविद्यालयातून शिकवले जात नाही. आनंद मिळवून देणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र. अध्यात्मशास्त्र हे कृतीच शास्त्र आहे. कृती म्हणजे साधना केल्यानेच खरा आनंद मिळतो. जीवनात सततचा आनंद अनुभवण्यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.

सद्गुरु सत्यवान कदम (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना श्री खोंडेकरीन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत पवार

तालुक्यातील खोंडे गावातील श्री खोंडेकरीन मंदिराच्या सभागृहात १८ जानेवारीला झालेल्या प्रवचनाच्या वेळी सद्गुरु सत्यवान कदम बोलत होते. या वेळी सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान श्री खोंडेकरीन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत पवार यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून केला. या प्रवचनाचा लाभ गावातील ११० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी चैतन्या भुवड हिने केले.

प्रवचनाला उपस्थित जिज्ञासू

विशेष  

१. ग्रामस्थांनी सभागृह आणि आवश्यक वस्तू विनामूल्य उपलब्ध करून दिल्या.
२. प्रवचनाच्या वेळी सभागृहात चैतन्यमय वातावरण अनेकांनी अनुभवले.

अभिप्राय

१. श्री. सुनील रेवाळे – कार्यक्रमापूर्वी आमच्या घराला सद्गुरूंची पावले लागली, हे आमचे मोठे भाग्य समजतो. आमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांविषयी सद्गुरूंचे मार्गदर्शन मिळाले. आजची तरुण पिढी भरकटत चालली आहे. त्यासाठी संस्कारवर्ग आणि साधना सत्संग ही काळाची आवश्यकता आहे. आदर्श समाज घडवायचा असेल, तर संस्कार आणि साधना समजून घेतली पाहिजे.

२. ह.भ.प. बाळकृष्ण बाईत – अध्यात्म हे कृतीचे शास्त्र कसे, हे सनातन संस्था शिकवते. सनातन शिकवत असलेले स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया समजून घेऊन कृती केल्याने मला तिचा लाभ झाला.