पानसरे हत्या प्रकरणात गोवण्यात आलेले निष्पाप समीर गायकवाड यांचे निधन !

समीर यांचे निधन हा व्यवस्थेने घेतलेला बळीच ! – सनातन संस्था

श्री. समीर गायकवाड

मुंबई : सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड (वय ४३ वर्षे) यांचे २० जानेवारी या दिवशी दुर्दैवी निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, अशी प्रार्थना आम्ही करत आहोत. समीर यांना वर्ष २०१५ मध्ये कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात नाहक अटक करण्यात आली. एका गाडीवरून आलेल्या २ मारेकर्‍यांनी हत्या केली. त्यांतील एक समीर गायकवाड आहे, असे अन्वेषण यंत्रणांनी सांगितले. एक शाळकरी मुलगा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून आणला; पण वर्षभरातच ‘ते दोन खुनी भलतेच आहेत’, असे घोषित केले. याचाच अर्थ समीर गायकवाड निर्दोष होते. कारागृहातही त्यांना त्रास भोगावा लागला. १९ महिने कारागृहात डांबून ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते जामिनावर बाहेर होते; मात्र न केलेल्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याने त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर या गोष्टीचा प्रचंड मानसिक ताण होता. ‘पानसरे खून खटल्यातील आरोपी’ ही प्रसारमाध्यमांतून झालेली अपकीर्ती इतकी मोठी होती की, व्यवसाय, नोकरी अशा सर्व ठिकाणी त्यांना त्रास झाला. सामान्य शेतकरी कुटुंबातील या निष्पाप साधकाचा अन्वेषण यंत्रणांनी केलेला छळ आणि पुरोगाम्यांनी केलेली अपकीर्ती यांमुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले होते.

लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्य धाब्यावर बसवत समीर गायकवाड यांना कोल्हापुरातून अधिवक्ताही मिळू दिला गेला नव्हता. या आणि अशा अनेक व्यवस्थेच्या अत्याचारांना त्यांना सामोरे जावे लागले; दुर्दैवाने आज त्यांचे निधन झाले. हे निधन नसून व्यवस्थेने त्यांचा बळी घेतला आहे, असेच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी दिली आहे.

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक –

श्री. चेतन राजहंस म्हणाले,…

श्री. चेतन राजहंस

१. जेव्हा समीर गायकवाड यांना अटक करण्यात आली, त्या वेळी अन्वेषणाच्या काळात पोलिसांना आढळून आले की, पानसरेंच्या हत्येच्या दिवशी समीर गायकवाड पालघर येथे होते; पण दबावामुळे त्यांनी ते न्यायालयासमोर आणले नाही. बचाव करतांना समीर गायकवाड हे न्यायालयासमोर आणू शकले असते; पण कदाचित् आता ती संधी गेली.

२. या प्रकरणात आजही त्यांची आरोपी क्र. १ म्हणून त्यांची नोंद आहे; परंतु समीर यांना जामीन मिळाल्यावर पोलिसांनी नवीन ‘थिअरी’ मांडत ‘पानसरे यांचा खून सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी केला’, असे घोषित केले.

३. काही महिन्यांनी पुन्हा दोन नवीन नावे समोर आणली. समीर हे या सदोष अन्वेषणाचा नाहक बळी ठरले. पुरोगाम्यांच्या दबावामुळे सनातनच्या साधकांना अडकवण्याचे पाप पोलिसांनी केले का ?

४. गायकवाड कुटुंबियांच्या दुःखात सनातन परिवार सहभागी आहे. गायकवाड कुटुंबियांशी वेळोवेळी बोलणे झाले, तेव्हा समजले की, या प्रकरणात नाहक गुंतवल्याचा ताण समीर यांच्या मनावर नेहमी होता. त्यांचे सार्वजनिक जीवन उद्ध्वस्त झाले होते. खुनातील आरोपी म्हणून त्यांना नोकरी मिळत नव्हती. या सर्व गोष्टींची भरपाई कोण देणार ? अजमल कसाबसारख्या नराधम अतिरेक्याला सरकारी खर्चाने अधिवक्ता मिळतो; फाशीची शिक्षा झालेल्यांसाठी रात्री १ वाजता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडले जातात; मात्र केवळ एक हिंदु, सनातन संस्थेचा साधक आणि गरीब शेतकर्‍याचा मुलगा आहे म्हणून समीर यांना अधिवक्ता मिळू दिला जात नाही. शासन त्यांचा जामीन रहित होण्यासाठी उच्च न्यायालयात जाते. उलट-सुलट पुरावे न्यायालयात पोलीस कुणाच्या दबावामुळे प्रविष्ट करतात ?

५. पुरोगाम्यांच्या वैचारिक आतंकवादाने शासनावर दबाव आला आणि शेवटी एकाचा बळी गेला, याचे दुःख आम्हाला आहे.

६. कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी याच्या मृत्यूनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाच्या न्यायमूर्तींनी शोक व्यक्त केला होता. संयुक्त राष्ट्र संघाने शोक व्यक्त करणारे प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. समीर गायकवाडसाठी कुणी उभा रहाणार का, हा प्रश्नही इथे नमूद करण्यासारखा आहे.

समीर गायकवाड यांच्या मृत्यूने त्यांचे निर्दाेषत्व सिद्ध करण्याची संधी हुकली ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधिज्ञ परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

मुंबई, २० जानेवारी (वार्ता.) : भगवा आंतकवाद सिद्ध करण्यासाठी पुरोगाम्यांनी जी ‘फेक नेरेटिव्ह’ची (खोट्या कथानकाची) साखळी रचली होती, त्यातीलच कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील समीर गायकवाड यांची अटक होती. समीर गायकवाड यांच्या निधनामुळे त्यांना या खटल्यात कशा प्रकारे गोवण्यात आले ? हे सिद्ध करण्याची संधी हुकली, अशी खंत या खटल्यातील समीर गायकवाड यांचे अधिवक्ता आणि हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्यक्त केली.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘डॉ. नरेंद्र दाभोलकर खटल्यामध्ये २ जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली, तेव्हापासून समीर गायकवाड मोठ्या प्रमाणात खचले होते. जामीन पुष्कळ विलंबाने मिळणे, त्यानंतर सरकारने जामिनाच्या विरोधात पुन्हा उच्च न्यायालयत जाणे, खटला विलंबाने चालू होणे या प्रकारांमुळे ते दु:खी होते. या सर्व काळात ‘कॉ. पासनसरे हत्या प्रकरणातील आरोपी’ म्हणून अपकीर्ती आणि संघर्ष त्यांच्या नशिबी आला. या खटल्यामुळे त्यांना कुणी काम देईना. कॉ. पानसरे हत्याकांडातील आरोपी म्हणून त्यांची जी हेटाळणी झाली, ती अतिशय वाईट आहे.’’

व्यवस्थेकडून झालेल्या खच्चीकरणाच बळी !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकर आणि सचिन अंधुरे यांना जेव्हा जन्मठेपीची शिक्षा झाली, तेव्हा समीर यांनी मला ‘त्यांना शिक्षा का झाली ?’ असे विचारले. त्या वेळी ‘त्यांना खरे सोडायला हवे होते. उच्च किंवा सर्वाेच्च न्यायालयात ते निश्चित निर्दाेष सुटतील; परंतु त्याला किती वर्षे लागतील ? हे सांगता येत नाही’, असे मी त्यांना म्हटले होते. त्या वेळी चालू असलेल्या ‘मिडिया ट्रायल’मुळे (माध्यमांनी न्यायाधिशांच्या भूमिकेत राहून केलेले वार्तांकन) त्यांचा पडलेला चेहरा मला आजही आठवतो. ‘कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणात मी निर्दाेष असूनही मला शिक्षा होईल का ?’, असे समीर यांनी मला विचारले होते. यावरून कुठेतरी व्यवस्थेकडून होणार्‍या खच्चीकरणाचा हा बळी असल्याचे मला जाणवले.’’

…याविषयी कुणी संवेदना व्यक्त करणार कि नाही ?

वर्ष २००८ मध्ये मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात ज्या प्रकारे स्वाधी प्रज्ञासिह यांना न्यायालयात आणण्यात आले ते पाहून न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या साहू नावाच्या त्यांच्या भक्ताचा भर न्यायालयात हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला; परंतु त्याची बातमीही कुठे प्रसिद्ध झाली नाही. कोरेगाव-भीमा दंगलीच्या प्रकरणातील आरोपी स्टेन स्वामी यांचे निधन झाले, तेव्हा उच्च न्यायालयासह संयुक्त राष्ट्र संघानेही शोक व्यक्त केला. समीर गायकवाड यांच्या निधनाची संवेदना कुणापर्यंत पोचेल का ? समीर मराठा होता म्हणून जरांगे पाटील काही बोलतील का ? ही एक अधिवक्ता म्हणूनही आणि एक सामान्य नागरिक म्हणूनही माझी व्यथा आहे, असे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले.


हे वाचा → समीर गायकवाड यांच्यासारखे आणखी किती जणांचे मृत्यू आपण होऊ देणार ?  

श्री. समीर गायकवाड यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते; मात्र उपचार चालू असतांनाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी हर्षदा, एक मुलगा, एक मुलगी, २ भाऊ, सनातनच्या साधिका सुश्री संगीता जाधव आणि सुश्री सविता जाधव या २ मावशा असा परिवार आहे. ‘दिवंगत समीर गायकवाड यांना सद्गती मिळो’, अशी सनातन परिवाराकडून भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !