(म्हणे) ‘उत्तर भारतात महिलांना मुले जन्माला घालण्यास सांगितले जाते, तर तमिळनाडूत प्रगतीला महत्त्व दिले जाते !’ – DMK MP Dayanidhi Maran

द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांचे उत्तर भारतातील महिलांविषयी आक्षेपार्ह विधान !

द्रमुकचे खासदार दयानिधी मारन

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडू एक द्रविड राज्य आहे, जिथे तुमच्या प्रगतीला महत्त्व दिले जाते. अनेक उत्तर भारतीय राज्यांमध्ये मुलींना काहीही करू दिले जात नाही. तमिळनाडूत आम्ही मुलींना ‘शिक्षण घ्या’, असे सांगतो, तर उत्तर भारतात मुलींना, ‘कामावर जाऊ नका. घरीच थांबा आणि स्वयंपाकघरात काम करा, मुले जन्माला घालावीत हेच तुमचे काम आहे’, असे सांगितले जाते, असे विधान द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी केले आहे. ते येथील ‘क्वाड-ए-मिल्लत गर्ल्स कॉलेज’मध्ये विद्यार्थिनींना संबोधित करतांना बोलत होते. दयानिधी मारन यांच्यासमवेत या कार्यक्रमात मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र तथा उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन हेही उपस्थित होते. त्यांनी ‘उलगम उंगल कैयिल’ योजनेच्या अंतर्गत ९०० विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटले.

मारन पुढे म्हणाले की, तमिळनाडूमध्ये मुलींचे शिक्षण आणि सक्षमीकरण यांवर लक्ष केंद्रित केले जाते. आमच्या विद्यार्थिनींना अभिमान वाटला पाहिजे. आम्ही तमिळनाडूमध्ये मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. त्यांना लॅपटॉप देतो, ज्याचा वापर त्या अभ्यास करण्यासाठी आणि मुलाखती देण्यासाठी करत आहेत.

मारन यांना सामान्य ज्ञान नाही ! – भाजप

भाजप नेते थिरुपथी नारायणन् यांनी मारन यांच्या विधानाचा निषेध करत म्हटले की, मला वाटत नाही की, दयानिधी मारन यांना काही सामान्य ज्ञान आहे. मी त्यांच्या विधानांचा तीव्र निषेध करतो. त्यांनी भारतातील लोकांची, विशेषतः हिंदी भाषिकांची क्षमा मागितली पाहिजे.

तमिळनाडूमध्ये ७३ टक्के महिला शिक्षित

वर्ष २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार तमिळनाडूमध्ये महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण सुमारे ७३.४४ टक्के आहे. हे ७ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकसंख्येशी संबंधित आकडेवारी आहे. हे उत्तर भारतातील बहुतेक राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. उत्तरप्रदेशात महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण ५७.१८ टक्के, हरियाणामध्ये ६५.९४ टक्के, राजस्थानमध्ये ५२.१२ टक्के आणि हिमाचल प्रदेशात ७५.९३ टक्के आहे.

संपादकीय भूमिका

दयानिधी मारन यांनी मुसलमान महिलांच्या संदर्भातही बोलले पाहिजे. त्यांची स्थिती सांगितली पाहिजे. तिहेरी तलाक, बुरखा (पूर्ण शरीर झाकणे), नकाब, (चेहरा झाकण्याचे जाळी असलेले वस्त्र) हिजाब (डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) आदींविषयी विधान केले पाहिजे. ते यावर जाणीवपूर्वक बोलणे टाळतात, हे लक्षात येते !