(म्हणे) ‘मिळेल ते खायची संस्कृती दलितांवर लादली !’ – ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ पुस्तकावरील परिचर्चेत सूर

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ पुस्तकावरील परिचर्चा

(सातारा), ५ जानेवारी (वार्ता.) – दलित समाजाकडे अन्नाचे षड्रस कधीच उपलब्ध नव्हते. ‘जे मिळेल ते खायचे’ हा एकमेव रस त्या अन्न संस्कृतीत होता. त्यामुळे ही संस्कृती दलित समाजावर लादलेली आहे, अशी मुक्ताफळे शाहू पाटोळेलिखित ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या पुस्तकावर आयोजित परिचर्चेत उधळली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या चर्चेचे आयोजन केले होते.

पाटोळे म्हणाले की, दलित लेखकांनी दलित खाद्यसंस्कृतीचा उल्लेख केला; पण त्याविषयी सविस्तर न लिहिल्याने  मला पुस्तक लिहावे लागले. या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर झाल्यानंतर त्याची नोंद इंग्रजी साहित्य विश्वात घेतली गेली. त्यानंतर मराठी साहित्य विश्वाचे लक्ष पुस्तकाकडे गेले. दलित समाजाला जे मिळाले ते खावे लागले, त्यामुळे आमच्यासाठी ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’च राहिले. (‘पूर्णब्रह्म’ या शब्दाचा अर्थ समजून न घेता मनाला येईल ते बोलणारे पाटोळे ! – संपादक) आमच्यावर ही खाद्यसंस्कृती जाणीवपूर्वक लादली गेली आहे. आम्हाला आमच्या अन्नाची लाज वाटावी, आम्ही मांसाहारी आहोत; त्याविषयी न्यूनगंड वाटावा, असे वातावरण जातीय संस्कृतीने निर्माण केले.

‘तुमचे पुस्तक कुठल्या जातीविरोधी आहे का ?’ या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले की, माझे पुस्तक वैदिक परंपरेचा विरोध करत नाही आणि मांसाहाराचा प्रचार करत नाही. माझ्या दृष्टीने दलित समाजाची बाजू कुणीतरी मांडावी, या दृष्टीने केलेले हे दस्तावेजीकरण आहे. (वैदिक परंपरेविषयी मनात एवढा द्वेष किंवा सल नसती, तर पाटोळे यांनी हा विषयच मांडला नसता ! – संपादक)

मिलिंद कसबे म्हणाले की, भारतीय वैदिक परंपरेने समाजावर ‘शाकाहार हे शुद्ध अन्न आहे’, असे विचार लादून वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकारण केले. ही खाद्यसंस्कृती नसून हुकूमशाही आहे. जो उच्चवर्णीय शुद्ध भाषा बोलतो, त्याचे अन्नही शुद्ध आहे आणि जे निम्नवर्गीय किंवा दलित आहेत त्यांची भाषा अन् अन्नही अशुद्ध आहे, असे वातावरण सिद्ध केले जात आहे. हे पुस्तक या गोष्टीची चिकित्सा करते. हे पुस्तक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चिकित्सा करणारे आहे. (जातीयवादाची कावीळ झालेलेच असे बोलू शकतात ! आज जगभर लोक शाकाहारी होत आहेत. शाकाहार आणि भाषाशुद्धी यावर जगात संशोधन होऊन त्याचे लाभ विदेशातील वैज्ञानिक सांगत आहेत. तेच वैदिक संस्कृतीने लाखो वर्षांपूर्वी सांगितले. त्याविषयी अभिमान बाळगण्याचे सोडून त्याचा द्वेष करणारे अशा लेखकांमुळेच आज मराठी साहित्याच्या दर्जाची अधोगती होत आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • भारतीय संस्कृतीत प्रामुख्याने वर्ण आणि प्रदेश यांनुसार आहार-विहाराच्या सवयी पडलेल्या आहेत, हे सत्य आहे. प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक निकष तिच्या जीवनातील पैलूवर प्रभाव टाकतो, हे ओघाने येतेच; मात्र कुठलेही सूत्र घेऊन त्यात जातीयवाद आणण्याची खोड मोडून काढली पाहिजे ! 
  • दलितांनी जर ‘मिळेल, ते खायचे’ असे असेल, तर षड्रस खाणार्‍यांकडून त्यांना त्याच रसाचाच आहार मिळत नसेल का ? त्यामुळे या विधानाअंतर्गतच मोठा विरोधाभास आहे !