दोडामार्ग तालुक्यात हत्तींच्या कळपाकडून बागायती उद्ध्वस्त

दोडामार्ग – तालुक्यातील घोटगेवाडी परिसरात ५ हत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा उपद्रव चालू केला आहे. येथील शेतकर्‍यांची शेती आणि बागायती यांची मोठ्या प्रमाणात हानी केली जात आहे. ३० डिसेंबरच्या रात्री हत्तींच्या कळपाने नारळ, सुपारी आणि केळी यांच्या बागा उद्ध्वस्त केल्या. यामुळे शेतकरी विठ्ठल शंभू गोवेकर आणि नारायण महाबळेश्वर भणगे यांची लाखो रुपयांची हानी झाली आहे. कष्टाने उभ्या केलेल्या बागा डोळ्यादेखत भूईसपाट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

वर्ष २०१९ मध्ये तिलारी नदीला आलेल्या महापुरात विठ्ठल गोवेकर यांची संपूर्ण बाग वाहून गेली होती. या संकटातून सावरत त्यांनी पुन्हा एकदा शून्यातून विश्व उभे केले होते; मात्र आता हत्तींनी हे सर्व उद्ध्वस्त केल्याने गोवेकर यांच्यावर संकट ओढवले असून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यास शासनकर्त्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी अन् ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.