रस्ते अपघातात प्रतिवर्षी १ लाख ८० सहस्र लोकांचा होतो मृत्यू ! – Nitin Gadkari

  • केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली माहिती

  • घायाळांपर्यंत १० मिनिटांत रुग्णवाहिका पोचवण्याची योजना

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

नवी देहली – भारतात प्रतिवर्षी सुमारे ५ लाख रस्ते अपघात होतात, ज्यात सरासरी १ लाख ८० सहस्र लोकांचा जीव जातो. यांपैकी ६६ टक्के मृत्यू तरुणांचे (१८ ते ३४ वर्षे) होतात, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली.

‘रस्ते, पायाभूत सुविधा सुधारून आणि कायदे कठोर करूनही सरकार मृत्यूंची संख्या न्यून करण्यात पूर्णपणे यशस्वी झालेली नाही’, अशी स्वीकृतीही मंत्री गडकरी यांनी या वेळी दिली.

गडकरी यांनी सांगितले की,

१. केंद्र सरकार राज्यांना आधुनिक रुग्णवाहिका देण्याची योजना आखत आहे. या अंतर्गत रुग्णवाहिका अपघाताच्या ठिकाणी १० मिनिटांच्या आत पोचेल. जर घायाळांना वेळेवर उपचार मिळाले, तर ५० सहस्र लोकांचे जीव वाचू शकतात.

२. गेल्या ५ वर्षांत संमत झालेले ५७४ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प निश्चित वेळेपेक्षा मागे पडले आहेत. यांची एकूण किंमत सुमारे ३ लाख ६० सहस्र कोटी रुपये आहे. यांपैकी ३०० प्रकल्प एका वर्षापेक्षा अल्प, २५३ एक ते तीन वर्षे आणि २१ प्रकल्प ३ वर्षांपेक्षा अधिक काळापासून विलंबित आहेत. १३३ नवीन रस्ते प्रकल्प (एकूण किंमत १ लाख कोटी रुपये) भूसंपादन आणि वन संमती यांमध्ये अडकले आहेत.

वर्ष २०२६ पर्यंत उपग्रह टोल प्रणाली

गडकरी यांनी सांगितले की, वर्ष २०२६ पर्यंत देशभरात उपग्रह-आधारित टोल प्रणाली लागू होईल. हे तंत्रज्ञान उपग्रह आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांवर आधारित असेल.

वाहनांमधून ‘फास्टॅग’ आणि क्रमांक पट्टी ओळख तंत्रज्ञानाद्वारे न थांबता टोल कापला जाईल. यामुळे १ सहस्र ५०० कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होईल आणि ६ सहस्र कोटी रुपयांच्या अतिरिक्त महसुलात वाढ होईल. पूर्वी जिथे टोल पार करण्यासाठी ३ ते १० मिनिटे लागत होती, आता हा वेळ अल्प करून शून्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.