मुख्य सचिवांवर हक्कभंग आणणार ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

विधानसभेतील अनेक लक्षवेधींना अद्याप उत्तरे नाहीत !

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन

नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपत आले, तरी सदस्यांनी मांडलेल्या अनेक लक्षवेधींना अद्याप उत्तरे देण्यात आलेली नाहीत. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यावर १४ डिसेंबर या दिवशी सभागृहाची बैठक संपेपर्यंत या लक्षवेधींची प्रलंबित उत्तरे दिली नाही, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल, अशी चेतावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १३ डिसेंबर या दिवशी दिली.

याविषयी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेले सूत्र अगदी योग्य आहे. कोणत्याही अधिकार्‍याला असे वाटत असेल की, विधीमंडळाच्या पीठासीन अधिकार्‍यांनी दिलेले निर्देश पाळणे बंधनकारक नाही, तर त्यावर कारवाई केली जाईल. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत सभागृहाच्या पटलावर प्रलंबित लक्षवेधींची उत्तरे आली नाहीत, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाची कारवाई केली जाईल, अशी त्यांनी चेतावणी दिली.