Karnataka Dharmasthala : कर्नाटकातील धर्मस्थळ मंदिराच्या प्रकरणामागे सुनियोजित कट !

विशेष अन्वेषण पथकाच्या चौकशीत उघड

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक धर्मस्थळ प्रकरण एक कटकारस्थान होते. हा संपूर्ण वाद धर्मस्थळविरोधी कार्यकर्त्यांनी निर्माण केला होता, असे उघड झाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष अन्वेषण पथकाने बेलतंगडी न्यायालयात प्राथमिक अन्वेषण अहवाल सादर केला आहे. यात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात मंदिर प्रशासनाला सध्या निर्दाेष ठरवले आहे. पथकाने न्यायालयाकडे तपास पूर्ण करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे.

पथकाने एकूण ६ लोकांना आरोपी बनवले आहे, ज्यात तक्रारदार चिन्नय्या, महेश शेट्टी तिमरोडी, गिरीश मत्तनण्णावर, जयंत, विठ्ठल गौडा आणि सुजाता भट्ट यांचा समावेश आहे. चिन्नय्या याच्यावर दबाव टाकण्यात आला, त्याला पैसे देण्यात आले आणि खोटे जबाब देण्यास भाग पाडण्यात आले, असे चौकशीत समोर आले.

मी आधीच सांगितले होते की, कट रचला जात आहे ! – उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार

कर्नाटक सरकारचे उपमुख्‍यमंत्री डी.के. शिवकुमार

उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले की, मी आधीच विधानसभेत बोललो होतो की, धर्मस्थळाविरुद्ध कट रचला जात आहे आणि आता सत्य समोर आले आहे. न्याय झाला आहे; पण कायदा त्याचे काम स्वतः करील. असे कट जुन्या आणि प्रतिष्ठित संस्थांना हानी पोचवतात. या कटामागे रा.स्व. संघ आणि भाजप यांच्यातील मतभेदही असू शकतात. पुढील अन्वेषणातूनच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

अहवालात काय म्हटले आहे ?

१. आरोपींनी एक कवटीची व्यवस्था केली, ती पुरावा म्हणून सादर केली. जागोजागी बनावट पुरावे पेरले आणि आधीच शिकवलेली विधाने कॅमेर्‍यावर सांगितली गेली.

२. कटाच्या अनेक बैठका महेश शेट्टी तिमरोडी याच्या घरी झाल्या.

३. या प्रकरणी बँक व्यवहाराचे पुरावे, इलेक्ट्रॉनिक डेटा, व्हिडिओ आणि साक्षीदारांचे जबाब पुरावे म्हणून मिळाले आहेत.

काय आहे प्रकरण ?

कर्नाटकातील मंगळुरूजवळ नेत्रावती नदीच्या काठी धर्मस्थळ मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवाचे एक रूप असलेल्या श्री मंजुनाथाचे आहे. ४ जुलै या दिवशी येथील एका माजी सफाई कर्मचार्‍याने पोलिसांना पत्र लिहून अनेक हत्या करून मृतदेह मंदिर परिसरात पुरल्याचा दावा केला होता. सरकारने विशेष अन्वेषण पथक स्थापन करून चौकशी चालू केली. आरोपी चिन्नैया याचा दावा होता की, त्याच्यावर दबाव टाकून १०० हून अधिक महिला आणि मुली यांचे मृतदेह पुरण्यात आले होते. पथकाने आतापर्यंत १७ ठिकाणी उत्खनन केले आहे. त्यांपैकी २ ठिकाणी केवळ पुरुषांचे सांगाडेच सापडले आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या मंदिरांना अपकीर्त करण्यामागे कोण आहेत ? हे उघड करून त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !