राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री

मुंबई – केंद्र शासनाने २४ डिसेंबर २०२५ च्या परिपत्रकाद्वारे जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्यात घर सूची आणि घर गणनेअंतर्गत प्रगणक, तसेच पर्यवेक्षक हे माहिती संकलनाचे कार्य डिजिटल माध्यमातून करतील, असे घोषित केले होते. त्यानुसार राज्यातील पहिल्या टप्प्यातील जनगणनेचे कामकाज १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडले आहे. माहिती संकलनाचे पूर्ण कामकाज १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात दिली.

या संदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला होता. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, घर सूची आणि घर गणनेच्या ३० दिवसांच्या कालावधीत प्रत्येक प्रगणकास अनुमाने १८० ते २०० गणन घरांच्या माहिती संकलनाचे कार्य करावयाचे आहे. जे प्रति दिवस २ घंट्यांच्या क्षेत्र भेटीमध्ये १० घरांचे गणन कार्य पूर्ण केल्यास विहित वेळेत पूर्ण करणे शक्य आहे. पहिल्या टप्प्यातील कामकाज पूर्ण केल्यानंतर प्रगणकास ९ सहस्र रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे.