दैनिक ‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्राच्या इतिहासात एक वेगळे आणि दखलपात्र म्हणून चिरकाल स्मरणात राहील !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीचा नुकताच वर्धापनदिन पार पडला. त्यानिमित्त वाचक श्री. भरत पाटील यांनी पुढीलप्रमाणे विचार व्यक्त केले.

हिंदूंचे पवित्र स्थान अर्थात् ‘हिंदुस्थान’ असे दिव्य नाव लाभलेल्या आपल्या देशात हिंदूंच्या धर्मरक्षणार्थ किंवा धर्मप्रसारणार्थ एखादेच दैनिक वृत्तपत्र असावे, ही तर खरी शोकांतिकाच म्हणावी लागेल; कारण ‘बहुतांशी वृत्तपत्रे ही भांडवलवादी आणि व्यावसायिक स्वरूपाची असल्याने धर्मप्रसारार्थ त्यांचा सहभाग ‘अल्प प्रमाण’ या सदरातच मोडतो’, असे दुर्दैवाने म्हणावे लागते, तर दुसरीकडे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये वेगवेगळ्या धर्मांत वेगवेगळे नियम असून त्याद्वारे हिंदूंच्या हिताचा धर्मप्रसार करण्याचे स्वातंत्र्य आपल्या हिंदूंनाच मिळत नाही, ही मोठी चिंताजनक गोष्ट आहे. त्यामुळे ‘सर्वधर्मसमभाव’ या संज्ञेखाली (किंवा त्याच्या आडून म्हटले तर हरकत नाही) या पवित्र हिंदु धर्मासाठी आणि धर्मरक्षणासाठी जे आवश्यक बाळकडू अन् हिंदुत्वाची जाण, ज्ञान आणि प्रचार-प्रसाराची शिकवण मिळायला हवी होती, ती मिळाली नाही.

या पवित्र कामी आपण वर्षानुवर्षे मागेच राहिलो, ही गोष्ट दुर्दैवी; पण खरी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दैनिक ‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्राने मागील २६ वर्षांपासून जी धर्मप्रसाराची धुरा एकहाती सांभाळली आहे, त्याच्या या कार्याचे कौतुक केवळ शब्दांत करून चालणार नाही, तर त्यात प्रत्येक हिंदु बांधवाने ताकदीने सहभाग घ्यायला हवा. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे या वृत्तपत्रासाठी कुठलेही आर्थिक पाठबळ नसतांना केवळ साधक आणि हिंदु धर्म यांसाठी हितचिंतकाची भूमिका बजावणार्‍या सामान्य लोकांकडून साधना अन् सेवा यांच्या माध्यमातून या वृत्तपत्रास जे बळ मिळाले आहे, ती वृत्तपत्राच्या इतिहासात एक वेगळी आणि दखलपात्र गोष्ट म्हणून चिरकाल स्मरणात राहील हे नक्की ! वास्तविक वृत्तपत्रे आणि शिक्षण संस्था या माध्यमांतून धर्मप्रसाराचे काम पुष्कळ प्रभावीरित्या होऊ शकले असते; परंतु ते दुर्दैवाने पुष्कळ अल्प प्रमाणात होत आहे. त्यामध्ये मोठी वाढ कशी होईल ? यासाठी शासन, प्रशासन, प्रसारमाध्यमे आणि हिंदु धर्मीय लोकांनी मनःपूर्वक प्रयत्न करावेत. या पवित्र कामी आपला सहभाग सकारात्मकरित्या नोंदवावा, ही अपेक्षा आणि दैनिक ‘सनातन प्रभात’साठी पुष्कळ पुष्कळ शुभेच्छा !

जय श्रीराम ..!

– श्री. भरत पाटील, संपादक, ‘नाथनगरी’ आणि विश्वस्त, श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट खरसुंडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.