नागोठणे (रायगड) येथील रिलायन्स प्रकल्पबाधित ३२४ जण नोकरीपासून वंचित !

न्याय्य हक्कांसाठी आझाद मैदानात ३७ दिवसांपासून उपोषण !

उपोषणाला बसलेले प्रकल्प बाधित

मुंबई – नागोठणे (रायगड) येथील रिलायन्सच्या ‘इथेन वायू’ प्रकल्पातील प्रकल्पबाधित भूमीपुत्र आझाद मैदानात ७ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करत आहेत. २ डिसेंबर हा उपोषणाचा ३७ वा दिवस आहे. रायगड जिल्ह्यातील चोळे ते नागोठणे या गावातील भूमी प्रकल्पासाठी अधिग्रहित केल्यानंतर तेथील बाधित भूमीपुत्रांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचे ठरले होते. त्यानुसार ९०० हून अधिक जणांना नोकरी मिळाली; मात्र ३२४ जणांना अद्यापही नोकरी मिळालेली नाही. या प्रकल्प बाधितांकडे आवश्यक प्रमाणपत्रे आहेत. त्यामुळे पात्र भूमीपुत्रांना रिलायन्सच्या नागोठणे येथील आस्थापनात कायमस्वरूपी नोकरीत घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे. यासंदर्भात २४ जून २०२५ या दिवशी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्य आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी २ महिन्यांत यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले असूनही प्रकल्पबाधितांना नोकरीत समाविष्ट करून घेण्यात रिलायन्सचे अधिकारी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे न्याय्य हक्कांसाठी आझाद मैदानात उपोषण करत आहेत.

आमच्याकडे वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या आणि राजकीय पक्ष यांचे दुर्लक्ष ! – गंगाराम मिनमिने, अध्यक्ष, भूमीपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था

मुंबईपासून १२० कि.मी. अंतरावरील नागोठणे येथून प्रवास करून आम्ही प्रकल्पबाधित उपोषण करत आहेत. आमचा आवाज देशातील वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचावा, यासाठी उपोषण करत आहोत. या भागात अनेक प्रतिथयश वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांची कार्यालये आहेत; मात्र कुणीही उपोषणाची बातमी प्रसिद्ध केली नाही. कोणत्याही राजकीय पक्षाने आम्हाला विचारले नाही. काही दिवसांपूर्वी आमच्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही लढा देत राहू.