IIT Mumbai : ‘आयआयटी बाँबे’च्या नावात ‘बाँबे’ ठेवल्याने मी खूश !’ – डॉ. जितेंद्र सिंह, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री

  • केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे विधान

  • मनसेचा विरोध !

डावीकडून डॉ. जितेंद्र सिंह आणि राज ठाकरे 

मुंबई – ‘आयआयटी बाँबे’च्या नावात तुम्ही ‘बाँबे’ कायम ठेवले आणि त्याचे मुंबई केले नाही, यासाठी मी खूश आहे. ‘आयआयटी मद्रास’विषयीही माझ्या याच भावना आहेत, असे विधान केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयआयटी मुंबई येथे केले. ‘आयआयटी मुंबई’च्या पी.सी. सक्सेना सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. जितेंद्र सिंह क्वांटम-तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती या विषयावर भाष्य केले. त्यांच्या या भूमिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे.

नाक घासून मराठी माणसाची क्षमा मागा ! – गजानन काळे, मनसे

गजानन काळे

याला विरोध करत मनसे नेते गजानन काळे म्हणाले, ‘‘अशा प्रकारे निर्लज्ज विधान केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबईत येऊन केले आहे. मराठी, मुंबई आणि महाराष्ट्र यांचा अपमान करण्याची एकही संधी भाजपचे नेते सोडत नाहीत. तुम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ या, पश्चात्ताप करा आणि नाक घासून मराठी माणसाची क्षमा मागा. पुढच्या वेळी डॉ. जितेंद्र सिंह मुंबईत आल्यास त्यांचा मनसेच्या वतीने ‘सत्कार’ करण्यात येईल.’’

‘आयआयटी मुंबई’साठी प्रस्ताव पाठवण्याची मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा ! – किरीट सोमय्या, भाजप

किरीट सोमय्या

यासंदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले, ‘‘आयआयटी बाँबे’ ऐवजी ‘आयआयटी’ मुंबई असे करावे, याविषयीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा’, अशी चर्चा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत केली आहे. ‘बाँबे हायकोर्ट’चेही आम्हाला ‘मुंबई’ हायकोर्ट हवे आहे.’’