बिहारमधील ‘एक्झिट पोल’ (मतदानोत्तर चाचणी) आणि आगामी राज्य निवडणुका यांविषयी निराशा वाढत असतांना गांधी-नेहरू राजघराण्याच्या ‘कार्टेल’पासून (काँग्रेसचे खासदार तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यापासून) पक्षाला मुक्त करण्यासाठी काँग्रेसमधील एक वरिष्ठ नेतृत्व गट प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे.

१. महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसची रणनीती अस्थिर
गांधी-नेहरू घराण्याच्या बंधनातून पक्षाला मुक्त करण्यासाठी आणि असक्षम नेत्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये हालचाली चालू आहेत. स्वयंघोषित नेत्यांच्या टोळीने काँग्रेसचे अपहरण केले आहे आणि ते त्यांच्या वैयक्तिक अन् निहित स्वार्थासाठी पक्षाचा वापर करत आहेत.

विविध दूरचित्रवाहिन्यांनी प्रसारित केलेल्या बिहार निवडणुकीवरील ‘एक्झिट पोल’मुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते (१० जनपथ) अप्रसन्न आहेत. या कुटुंबाच्या प्रतिनिधी मंडळींनी बैठक बोलावली होती, ज्यात मुलगा राहुल गांधी, मुलगी प्रियांका गांधी वाड्रा, जावई रॉबर्ट वाड्रा आणि कुटुंबीय उपस्थित होते.
संपूर्ण बिहारमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील ‘व्होट (मत) चोरी’ मोहीम विस्कळीत झाल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जनतेचा जनादेश मोडून काढण्यासाठी आणि राज्यात सत्ता काबीज करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘‘बिहारची निवडणूक आमच्यासाठी महत्त्वाची आहे; कारण पुढील वर्षाच्या प्रारंभीला केरळ, तमिळनाडू, बंगाल येथे होणार्या विधानसभा निवडणुकांसाठी ती पूर्वसिद्धता म्हणून पहावी लागेल’’, असे एका काँग्रेस नेत्याने झालेल्या चर्चेची माहिती म्हणून सांगितले.
२. मुस्लीम लीगची दुःस्थिती आणि तिने काँग्रेसला सुनावलेले खडे बोल
केरळमधील मुस्लीम लीगच्या नेतृत्वाने गांधी कुटुंबाला सांगितले आहे, ‘काँग्रेसच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवण्याची शक्यता नसल्याने लोकशाही आघाडीत रहायचे कि नाही ?, यावर आम्हाला विचार करावा लागेल.’ केरळमध्ये वर्ष २०१६ पासून मुस्लीम लीग सत्तेत नाही आणि मर्यादित स्रोतांमुळे त्याला पक्ष सांभाळणे कठीण जात आहे.
केरळमध्ये कार्य करण्यासाठी मुस्लीम लीगला केवळ तमिळनाडू आणि कर्नाटक ही राज्ये निधी पुरवत आहेत. त्यामुळे पक्षाला खर्चाचे नियोजन अतिशय अल्प करावे लागत आहे. विधानसभा निवडणुकीत जर मुस्लीम लीगने २० जागा मिळवल्या, तर पक्षांतर करून सदस्य निवडणुकीत सरशी होणार्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात ते जाऊ शकतात.
३. संसदेचे हिवाळी अधिवेशन उलथवून टाकण्याचे काँग्रेसचे षड्यंत्र उघड
आता बिहारच्या निवडणुकीनंतर देशात सर्वत्र जोरदार निषेध मोर्चे काढण्याचे काँग्रेसचे नियोजन उघड झाले आहे. त्यामुळे हा सर्वांत जुना पक्ष आता १ डिसेंबर २०२५ पासून चालू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन उलथवून टाकण्याचा प्रयत्न करण्याची सिद्धता करत आहे. ‘देशातील घटनात्मक यंत्रणेत बिघाड आणि अराजक माजले आहे’, या काँग्रेस पक्षाच्या आरोपांना अधिकाधिक प्रसिद्धी मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. या मोहिमेद्वारे बातम्यांसाठी भुकेलेल्या वृत्तवाहिन्यांना चांगले खाद्य मिळेल.
४. गांधी कुटुंबासाठी ‘करा किंवा मरा’ अशी सद्यःस्थिती
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदार सूचींचे विशेष सखोल पुनरावलोकन यांच्या विरोधात असलेले आंदोलन ही मतदार पडताळणी प्रक्रिया थांबवण्याच्या मागणीचा मूर्खपणा अधिकाधिक लोकांना कळल्यामुळे थंडावले आहे. ही परिस्थिती गांधी कुटुंबासाठी ‘करा किंवा मरा’, अशी आहे. गांधी कुटुंबातील माता (सोनिया गांधी) आणि पुत्र (राहुल गांधी) ही जोडी पैशांचा अपहार (‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण हे केवळ एक उदाहरण आहे) प्रकरणासह ‘मनी लाँड्रींग प्रतिबंधक कायद्या’नुसार अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये गुंतलेले आहेत. जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहार निवडणूक सहजपणे जिंकली आणि काँग्रेस पुढच्या वर्षाच्या प्रारंभीला केरळ, तमिळनाडू अन् बंगाल या ठिकाणच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्यास अपयशी ठरली, तर येत्या काही महिन्यांत पक्षातील गांधी कुटुंबियाच्या भूमिकेविषयी दुसर्या फळीतील नेते प्रश्न विचारण्याची शक्यता अधिक दाट आहे.
५. राहुल गांधी यांनी पुस्तके लिहिणे किंवा व्यवस्थापन सल्लागाराची सेवा करावी !
यामुळे अतिशय जुन्या असलेल्या या पक्षामध्ये पुन्हा नवचैतन्य आणण्यासाठी प्रियांका गांधी वाड्रा यांचा मुलगा रेहान याचा विचार करणे, हा एकमेव पर्याय गांधी कुटुंबियांकडे आहे. पक्षाला जिंकून देण्यात राहुल गांधी यांचे नेतृत्व सक्षम नाही, हे निःसंशयपणे सिद्ध झाले आहे. ३ वेळा अपयशी ठरल्यानंतर राहुल गांधी यांनी गांधींच्या नवीन पिढीला वाव देण्याची वेळ आली आहे. रेहान याचे वय २५ वर्षांपेक्षा अधिक असून तो निवडणूक लढवून देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे. ‘राहुल गांधी यांच्या भाषणांच्या वेळी स्वतःचे हसू दाबून ठेवणारे काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते राजीव गांधी यांच्या या मुलाने पुस्तके लिहिणे किंवा व्यवस्थापन सल्लागाराची सेवा चालू करावी’, असे बोलू लागले आहेत.
लेखक : श्री. कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, केरळ.
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !