हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर नाव पालटलेल्या ‘तू बोल ना’ चित्रपटाकडे प्रेक्षकांची पाठ

मुंबई – ‘मनाचे श्लोक’ असे नाव देऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावलेल्या चित्रपटाला नामांतरानंतरही हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. ‘तू बोल ना’ असे नाव पालटल्यानंतरही या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. १६ ऑक्टोबर या दिवशी नव्या नावाने हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता; मात्र २१ ऑक्टोबर या दिवशी ‘बूक माय शो’ या ॲपवरून हा चित्रपट कुठे कुठे प्रदर्शित झाला आहे ? हे पाहिले असता महाराष्ट्रातील एकाही चित्रपटगृहात हा चित्रपट दिसत नाही.

सद्यःस्थितीत राज्यातील चित्रपटगृहांमध्ये ‘प्रेमाची गोष्ट २’ आणि ‘दशावतार’ या २ चित्रपटांचे खेळ चालू आहेत. ‘तू बोल ना’ हा चित्रपट कौटुंबिक कथानकावर आधारित असलेल्या आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ दाखवलेल्या चित्रपटाला समर्थ रामदासस्वामी लिखित ‘मनाचे श्लोक’ या आध्यात्मिक साहित्याचे नाव देण्यात आल्यामुळे समर्थभक्त अन् हिंदुत्वनिष्ठ यांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. वाढता विरोध पाहून या चित्रपटाचे नामांतर ‘तू बोल ना’ असे करण्यात आले. चित्रपटाच्या नामांतरानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी हिंदुत्वनिष्ठांवर टीका करत चित्रपटाचे नाव पालटण्यावर आक्षेप घेतला होता. या चित्रपटाच्या निर्मात्या अभिनेत्री मृणाल देशपांडे या आहेत.