मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने शिर्डीतील ‘साई संस्थान’चे ४७ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंद !

विद्युत् विभागात ७७ लाख रुपयांचा अपहार झाल्याची संजय काळे यांची तक्रार !

अहिल्यानगर – शिर्डीतील साई संस्थानच्या विद्युत् विभागामध्ये ७७ लाख १४ सहस्र रुपयांच्या साहित्याचा अपहार झाल्याची तक्रार शिर्डी पोलिसांत प्रविष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी संस्थानच्या विद्यमान आणि सेवानिवृत्त अधिकारी अन् कर्मचारी अशा ४७ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाच्या आदेशानंतर ही तक्रार प्रविष्ट करण्यात आली.

संजय काळे (कोपरगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा अपहार वर्ष २०१७ ते २०२३ या कालावधीत झाला आहे. साई संस्थानच्या विद्युत् विभागातील ‘डेड स्टॉक रजिस्टर’मध्ये खोट्या नोंदी करून आणि साहित्याची नोंद न ठेवता आरोपींनी संगनमताने ही चोरी केली. यापूर्वी २३ मे २०२२ या दिवशी केवळ २२ सहस्र ५०० रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचा गुन्हा नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संस्थानच्या अंतर्गत लेखापरीक्षण अहवालात जवळपास ७७ लाख १४ सहस्र रुपयांचे साहित्य नसल्याचे आढळले, तसेच लेखापरीक्षणानंतर २९ लाख ७१ सहस्र रुपयांचे साहित्य ‘साई संस्थान’मध्येच आढळून आले. त्यानंतर संस्थानाच्या प्रशासनाने ४७ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर सापडत नसलेल्या साहित्याचे दायित्व निश्चित केले होते. विशेष म्हणजे यांपैकी ३९ जणांनी त्यांच्यावरील निश्चित केलेली रक्कम संस्थानकडे जमा केली असून अन्य ८ जणांनी अद्याप रक्कम भरलेली नाही.

संस्थान व्यवस्थापनाने तक्रार न दिल्याने संजय काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या १५ ऑक्टोबर २०२५ च्या आदेशानंतर शिर्डी पोलिसांनी १७ ऑक्टोबरला गुन्हा नोंदवला.

संपादकीय भूमिका

देवस्थानांचे सरकारीकरण झाल्याचा दुष्परिणाम ! एवढ्या मोठ्या प्रमाणात अपहार होईपर्यंत त्याकडे कुणाचेच लक्ष कसे नव्हते ? हिंदूंची मंदिरे भक्तांच्या कह्यात असणे आवश्यक !