‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचे नाव पालटा !

श्री समर्थ रामदासस्वामी संस्थान आणि श्री समर्थ सेवा मंडळ यांची निवेदनाद्वारे मागणी

निवेदन स्वीकारतांना निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आणि उपस्थित समर्थभक्त

सातारा, १० ऑक्टोबर (वार्ता.) – ‘मनाचे श्लोक’ हा राष्ट्रसंत श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी रचलेल्या २०५ श्लोकांचा पवित्र, मार्गदर्शक आणि लोककल्याणकारी ग्रंथ आहे. ‘मनाचे श्लोक’ हे ग्रंथाचे नाव आहे. त्यालाच ‘मनोपनिषद’ असेही म्हणतात. त्यामुळे ‘मनाचे श्लोक’ हे नाव एखाद्या चित्रपटाला देणे, हा समर्थ रामदासस्वामी यांचा अपमान आहे. त्यामुळे हे नाव पालटण्यात यावे, अशी मागणी श्रीक्षेत्र सज्जनगड येथील ‘श्री समर्थ सेवा मंडळ’ आणि ‘श्री समर्थ रामदासस्वामी संस्थान’ यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य अन् केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे (सेन्सॉर बोर्डाकडे) केली आहे. याविषयीचे निवेदन उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी स्वीकारले.

या वेळी श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, मंडळाचे विश्वस्त सर्वश्री गजाननराव बोबडे, संतोषबुवा वाघ, राजेंद्रबुवा कुलकर्णी, श्री रामदासस्वामी संस्थानचे व्यवस्थापक उदयबुवा रोकडे, अभिजितबुवा रामदासी, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. हेमंत सोनवणे, सुराज्य अभियानाचे जिल्हा समन्वयक श्री. राहुल कोल्हापुरे, सामाजिक कार्यकर्ते राजीव गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

या निवेदनामध्ये म्हटले आहे की, ‘श्री समर्थलिखित ‘मनाचे श्लोक’ हा ग्रंथ ३५० वर्षांहून अधिक काळ साधकांना साधनेमध्ये मार्गदर्शन करत आहे. जागतिक स्तरावर मनाच्या लोकांचा अभ्यास पठण आणि प्रसार-प्रचार अत्यंत श्रद्धेने केला जात आहे. यामुळे शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक उन्नतीचा हा प्राचीन ग्रंथ असून अखिल भारतियांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. चित्रपटामध्ये मनोरंजन किंवा काल्पनिक कथानक यांसाठी जर ग्रंथाच्या नावाचा वापर केला जात असेल, तर तो राष्ट्रसंत श्री समर्थ रामदासस्वामींचे कार्य आणि संतपरंपरा यांचा अवमान ठरेल . त्यामुळे या चित्रपटाचे नाव पालटण्यात यावे, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल.’