गुलामगिरीची ओळख मनामनांतून पुसण्यासाठी श्री दुर्गादेवीच्या चरणी संपूर्णपणे शरण जाऊया ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

दुर्गादौड मध्ये सहभागी युवक

सांगली, २३ सप्टेंबर (वार्ता.) – या जगामध्ये आपल्या भारताची ओळख ही आजही ‘१ सहस्र ३०० वर्षे पारतंत्र्यात जगलेला आणि युरोपीय लोकशाहीची राज्यघटना स्वीकारलेला गुलामगिरीतील देश’, अशी आहे. ही गुलामगिरीची ओळख मनामनांतून पुसून टाकायला हवी. यासाठी आपल्या देशाचे बलस्थान श्री दुर्गादेवी आहे, हे ओळखून श्रीचरणी संपूर्ण शरण जाऊया, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे केले. २३ सप्टेंबर या श्री दुर्गादौडीच्या दुसर्‍या दिवशी ते धारकर्‍यांसमोर मार्गदर्शन करत होते.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

आपल्या माथ्यावर शिरस्त्राण, फेटा बांधून टोपी घालून पवित्र असा छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी मंत्र मनामध्ये भिनवू. आपल्याला शक्ती, बुद्धी आणि प्रेरणा हवी आहे आणि ती आपल्याला आई दुर्गेकडून मिळणार आहे. यासाठी संपूर्ण शरणागतभावाने, कळकळीने आणि तळमळीने आई दुर्गेकडे राष्ट्र उभारणीसाठी अन् ही गुलामगिरीची ओळख पुसून टाकण्यासाठी शक्ती मागूया. या राष्ट्राच्या उभारणीसाठी अर्थातच हा लढा जिंकण्यासाठी जशी आपण कुस्ती निकाली करण्यासाठी पूर्ण शक्ती लावतो, तसेच सर्वार्थाने राष्ट्रासाठी तन-मन आणि धन यांनी समर्पित होऊया. जेव्हा आपण तळमळीने मागू, तेव्हा देवी या देशावर नक्कीच कृपा करील. – पू. संभाजीराव भिडेगुरुजी