Shivaji Nagar Metro Station : बेंगळुरूमधील शिवाजीनगर येथील नूतन मेट्रो स्थानकाचे ‘सेंट मेरी’, असे नामकरण करण्याचा घाट

स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची हिंदु राष्ट्र समन्वय समितीची सरकारकडे मागणी!

श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक

बेंगळुरू (कर्नाटक) –ब्रिटीश देशातून जाऊन ७८ वर्षे झाली. तरीही ब्रिटीश आणि ख्रिस्ती नावे देऊन कुणालातरी खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी बेंगळुरूच्या शिवाजीनगर येथील नवीन मेट्रो स्थानकाला ‘सेंट मेरी’ असे नाव देण्याची आवश्यकता नाही. आम्हाला ब्रिटिशांची ओळख नको, आम्हाला भारताची ओळख हवी आहे. तुम्ही या शहराला ख्रिस्ती शहर, व्हॅटिकन सिटी बनवणार आहात का ? जर तुम्ही आमची मागणी स्वीकारली नाही, तर आम्ही आंदोलन करू, अशी चेतावणी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी दिली. वरील विषयावर हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली विविध हिंदु संघटना आणि शिवाजीनगरमधील रहिवासी यांनी ‘बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन दिले. त्या वेळी श्री. मुतालिक बोलत होते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा, शिवाजीनगर येथील आंजनेय स्वामी मंदिराचे विश्वस्त श्री. प्रदीप कुमार, वीर शिवाजी सेनेचे श्री. कमलेश राव, शिव गर्जना सेनेचे श्री. दीपक चौहान, श्रीराम सेनेचे श्री. सुंदरेश नगरल आणि श्री. मंजुनाथ, दुर्गा सेनेच्या सौ. सरस्वती प्रवीण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

निवेदनात मांडलेली सूत्रे –

१. वर्ष १६३० ते १६४० या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे बालपण त्यांचे वडील शहाजी महाराज यांच्यासमवेत बेंगळुरूतील शिवाजीनगर भागात घालवले होते. त्या वेळच्या मैसुरू शासकांनी सन्मानाचे प्रतीक म्हणून या भागाला ‘शिवाजीनगर’, असे नाव  दिले.

२. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. मेट्रो स्थानकाला त्यांचे नाव दिल्याने भारताच्या परंपरेचाही गौरव होईल.

३. सरकारने मतपेढीच्या राजकारणासाठी इतिहास विकृत करू नये आणि जनतेच्या भावना, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचे रक्षण करावे.

स्थानिकांचे मत

शिवाजीनगरमध्ये कन्नड आणि मराठी समाजाची लोकसंख्या अधिक आहे. स्थानिक आणि शहरातील लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्थानक असणे अभिमानाची गोष्ट आहे. ‘सेंट मेरी’ असे नाव दिल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होईल आणि स्थानिकांच्या भावना दुखावतील.

संपादकीय भूमिका

काँग्रेसला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आधीपासूनच द्वेष असल्याने सरकार त्यांचे नाव देणार नाही, यात आश्चर्य नाही. धर्मप्रेमी हिंदूंनी सरकारवर दबाव आणून महाराजांचे नाव देण्यास भाग पाडले पाहिजे !