पू. शिवाजी वटकर यांनी पाठवलेल्या योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या संतवचनाचे वारंवार स्मरण केल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि तिच्यात झालेले पालट ! 

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

‘सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७८ वर्षे) हे प्रतिदिन प्रातःकाळी त्यांच्या संपर्कातील अनेक साधकांना भ्रमणभाष प्रणालीद्वारे विविध संतवचने पाठवतात. ती वाचून मला पुष्कळ आनंद मिळतो आणि ‘माझ्या साधनेला चालना मिळते’, असे मला जाणवते. २३.३.२०२५ या दिवशी त्यांनी मला योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे पुढील संतवचन पाठवले – ‘घडणारी प्रत्येक घटना मनुष्याच्या प्रारब्धकर्मानुसार, तसेच ईश्वरी इच्छेनुसार घडत असते. मनुष्याच्या अहंकारामुळे त्याला ‘मी करतो’, असा भ्रम होत असतो.’ हे संतवचन मी पुनःपुन्हा आठवू लागले. त्यानंतर मला जाणवलेली सूत्रे आणि माझ्यात झालेले पालट पुढे दिले आहेत. 

पू. शिवाजी वटकर

१. जाणवलेली सूत्रे

अ. एखाद्या भांड्यावर जसा पुष्कळ चिकट आणि घट्ट मळ असतो, तसा माझ्या मनावर अहं चिकटून बसला आहे. ‘संतवचनाचे स्मरण कार्य करत असून ते माझ्या मनावरील मळ सहजपणे काढून माझे मन स्वच्छ करत आहे’, असे मला जाणवते.

आ. ‘संतवचन म्हणजे चैतन्याचा प्रवाहच आहे आणि ते गतीने कार्य करत आहे’, असे मला वाटते.

इ. ‘प्रतिदिन ईश्वर संतवचनाचे महत्त्व माझ्या मनावर बिंबवत आहे’, असे मला जाणवले.

सौ. आदिती देखणे

२. स्वतःत जाणवलेले पालट 

अ. हे संतवचन सतत आठवल्याने प्रत्येक प्रसंगामध्ये माझे मन शांत आणि स्वीकारण्याच्या स्थितीत राहू लागले.

आ. काही प्रसंगांत माझ्या मनाचा संघर्ष झाला; परंतु संतवचनाचे स्मरण केल्यानंतर मला ते प्रसंग आणि संघर्ष यांतून लवकर बाहेर पडता आले.

इ. एका कठीण प्रसंगात मला माझे मन पुष्कळ सकारात्मक आणि शांत ठेवता आले. या आधी या संतवचनाचे स्मरण करत नसतांना जर हा प्रसंग घडला असता, तर माझ्यातील ‘अपेक्षा करणे’ आणि ‘भावनाप्रधानता’ या स्वभावदोषांमुळे मी त्या विचारांमध्ये अडकून बसले असते. परिणामी माझी साधना खंडित होऊन माझा आध्यात्मिक त्रास वाढला असता. संतवचनाचे स्मरण करत असल्यामुळे मला ‘हा प्रसंग स्वीकारणे आणि नंतर सर्वांशी सकारात्मकतेने अन् प्रेमभावाने वागणे’ अगदी सहजपणे जमले. ‘इतर व्यक्तींचे स्वभावदोष दिसल्यानंतर ते स्वीकारून त्यांना क्षमा करणे’, हे गुरुदेवांच्या कृपेमुळे मला शक्य झाले.

ई. या संतवचनाचे स्मरण केल्यावर ‘मागील काही घंट्यांमध्ये माझ्यातील कर्तेपणा किंवा अहं कुठे प्रकट झाला ?’, हे माझ्या लक्षात येते.

उ. ‘कर्ता देव आहे’, हे माझ्या मनावर सतत बिंबत असल्याने ‘प्रत्येक गोष्ट ईश्वराने आपल्याकडून करून घेतली’, या विचाराने मला कृतज्ञता वाटते.

‘संतांची शिकवण जीवनात नसती, तर माझ्यासारख्या पामराला अहं-निर्मूलन प्रक्रिया कशी जमणार होती ?’, असे मला वाटते. ही सूत्रे गुरुदेवांच्या कोमल चरणी अर्पण करते आणि त्यांच्या अन् पू. वटकरकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. आदिती देखणे, नवीन पनवेल, रायगड. (२७.४.२०२५)