Omar Abdullah : (म्हणे) ‘धार्मिक वास्तूवर राष्ट्रचिन्ह लावण्याची आवश्यकताच काय होती ?

काश्मीरच्या हजरतबल दर्ग्यातील अशोक चिन्ह काढल्याच्या प्रकरणी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे धर्मांध वक्तव्य

धर्मांध मुसलमानांनी अशोक चिन्ह फोडले

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील हजरतबल दर्ग्यातील एका अतिथीगृहावर असलेले अशोक चिन्ह काही धर्मांध मुसलमानांनी फोडून काढल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेला तीव्र विरोध होत असतांना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घटनेचे एक प्रकारे समर्थन केले आहे. अब्दुल्ला म्हणाले की, दर्ग्यात ‘राष्ट्रीय चिन्ह’ लावण्याची आवश्यकताच काय होती ?

विरोधी पक्ष असलेल्या पीडीपीच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही ओमर यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. (काश्मीरला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणार्‍या या सर्व राजकीय नेत्यांना आजन्म कारावासात डांबा ! अन्यथा ‘हिंदु भारता’च्या हातून काश्मीर निसटणार, हेच खरे ! – संपादक)

दुसरीकडे लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता म्हणाले की, हजरतबल दर्ग्याच्या नूतनीकरण फलकावर अशोक चिन्हाची तोडफोड झाल्याने पुष्कळ दुःख झाले आहे. अशोक चिन्ह हे आपल्या सार्वभौमत्वाचे आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. अशा कृत्यांमुळे आपल्या राष्ट्रीय भावना दुखावल्या जातात आणि त्या सहन केल्या जाणार नाहीत. दुष्कृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल.

ओमर अब्दुल्ला

काय आहे प्रकरण ?

हजरतबल दर्ग्यात एका नवीन अतिथीगृहाची अलीकडेच पायाभरणी झाली. यामध्ये तेथील फलकावर अशोक स्तंभ हे राष्ट्रीय प्रतीक स्थापित करण्यात आले होते. ४ सप्टेंबरला काही कट्टरपंथी मुसलमानांनी ‘अशोक स्तंभ हे मूर्तीसारखी वस्तू आहे. ती इस्लामविरोधी आहे’, असे सांगत त्याला दगडांनी फोडून काढले.

संपादकीय भूमिका

भारताचे विभाजन होऊन ७८ वर्षे झाली, तरी विभाजन करणार्‍या धर्मांध शक्तींचे वंशज आजही एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ही गोष्ट देशासाठी लज्जास्पद !