Karnataka Elections : कर्नाटकात मतदान यंत्रांद्वारे नाही, तर मतदान पत्रिकेद्वारे होणार निवडणुका !

निवडणूक आयोगावर अविश्वास दाखवत कर्नाटकातील काँग्रेसचा अजब निर्णय

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक स्थानिक निवडणुका मतदान यंत्रांद्वारे नाही, तर ‘बॅलेट पेपर’द्वारे (मतदान पत्रिकेद्वारे) लढवणार असल्याची घोषणा काँग्रेस सरकारने केली आहे. काँग्रेसचा दावा आहे की, मतदान यंत्रांमुळे निवडणुकीत हेराफेरी होत आहे. तथापि निवडणूक आयोगाने अनेक वेळा विरोधकांचे दावे फेटाळून लावले आहेत. आयोगाच्या मते, मतदान यंत्रे ‘हॅक’ करणे केवळ कठीणच नाही, तर अशक्य आहे. असे असले, तरी कर्नाटक मंत्रीमंडळाने राज्यातील आगामी पंचायत आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘बॅलेट पेपर’ने घेण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला करण्याचा निर्णय जाहीर केला.

कर्नाटकाचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच्.के. पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, लोकांचा ‘मतदान यंत्रां’वरील विश्वास आणि विश्वासार्हता अल्प होत आहे. (मतदान यंत्रांवर नव्हे, तर समाजघातकी काँग्रेसवरील लोकांचा  विश्वास अल्प झाला आहे ! – संपादक) ते म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाला ‘मतदार सूचीत सुधारणा करणे सोपे व्हावे’, यासाठी आम्ही आवश्यक कायदेशीर उपाययोजना करण्याचा आणि विद्यमान नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

संपादकीय भूमिका

  • वर्ष २०२५ मध्ये, म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या विश्वात कर्नाटकातील काँग्रेस ही मतदान पत्रिकेद्वारे निवडणुका लढवणार, हे हास्यास्पदच होय !
  • भारतीय लोकशाही संस्थांविषयी एका राज्य सरकारने अशा प्रकारे अविश्वास दाखवणे, हा लोकशाहीच्या अवमूल्यनाचा प्रयत्न होय. भारतविरोधी कथानकाचाच हा भाग आहे, हे लक्षात घ्या !