६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. धैवत वाघमारे (वय ४६ वर्षे) यांच्या मृत्यूनंतरच्या साधनाप्रवासाविषयी प्रगल्भतेने आणि सूक्ष्मातून सांगणारे पू. वामन राजंदेकर (वय ६ वर्षे) !

पू. वामन राजंदेकर

‘१७.६.२०२५ या दिवशी दुपारी आम्हाला रामनाथी आश्रमातील साधक धैवत वाघमारे यांचे अकस्मात् निधन झाल्याचे समजले. याविषयी मी पू. वामन राजंदेकर (सनातनचे दुसरे बालसंत, वय ६ वर्षे) यांना सांगितले. त्या वेळी मी आणि पू. वामन यांच्यात झालेला संवाद पुढे दिला आहे. पू. वामन यांनी प्रगल्भतेने आणि कै. धैवत वाघमारे यांच्या साधनाप्रवासाविषयी सूक्ष्मातून त्यांना कळलेले सांगितले. 

कै. धैवत वाघमारे

१. ‘कै. धैवत यांच्या समवेत नारायण असून, ते साधना करून पुढच्या लोकात प्रवास करून शेवटी नारायणांच्या चरणी एकरूप होणार आहेत’, असे सांगणे 

सौ. मानसी : पू. वामन, आपल्या आश्रमातील साधक धैवत वाघमारे यांचे निधन झाले आहे, म्हणजे ते आता आश्रमात भेटतात, तसे आपल्याला भेटणार नाहीत. ते देवबाप्पाकडे गेले.

पू. वामन : हो. आई, ते मला समजले. ते आपल्या समवेत सूक्ष्मातील प्रयोगांना असायचे आणि आपल्याला आश्रमात भेटायचे. तेच धैवतमामा ना !

सौ. मानसी राजंदेकर

अ. आता ते नारायणांच्या अगदी जवळ गेले आहेत. नारायण त्यांच्या समवेत आहेत; कारण ते नारायणांचे आवडते साधक आहेत ना !

(पू. वामन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘नारायण’ असे संबोधतात.)

आ. काहीच काळजी करायला नको आणि काही वाईट झाले नाही. त्यांना नारायणांनी पुढे नेले आहे.

इ. ते आनंदात आहेत आणि त्यांची साधना त्यांच्या समवेत आहे. ते नारायण सांगतील, तशी साधना करत पुढच्या लोकांत प्रवास करून शेवटी नारायणांच्या चरणी एकरूप होतील.

ई. आताही नारायण त्यांना भेटायला प्रत्यक्ष येणार आहेत. त्यामुळे कसलीच काळजी नाही.

उ. त्यांचा आध्यात्मिक त्रास आता संपला आहे. ते आनंदाची अनुभूती घेत आहेत.

२. ‘सर्व माहिती नारायण देतात आणि सर्वांनी चांगले वागले पाहिजे’, असे सांगणे  

त्यानंतर पू. वामन एकदम शांत झाले. मी त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला त्यांच्याबद्दल हे सर्व कसे ठाऊक झाले ?’’ त्यावर पू. वामन म्हणाले, ‘‘मला हे नारायणांनीच सांगितले आणि नारायणांचे सर्वांकडेच लक्ष असते. आपण चांगले वागलो, तर आपण नारायणांकडे जातो; पण जे चुकीचे आणि वाईट वागतात, त्यांना नारायण शिक्षा करतात. आपण खरे आणि चांगले वागले पाहिजे; कारण नारायणांना सर्व ठाऊक असते.’’ या संभाषणानंतर पू. वामन शांत झाले. ‘त्या दिवशी आणि नंतर पुढील २ दिवस ते अन्य दिवसांपेक्षा अधिक शांत होते’, असे मला जाणवले.’

– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांच्या आई), फोंडा, गोवा. (२३.६.२०२५)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.