जोतिबा देवस्थानात भेसळयुक्त पेढे; प्रशासन उदासीन – सुनील नवाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य, वाडी-रत्नागिरी

प्रशासनाने कारवाई न केल्यास जोतिबा डोंगरावर आमरण उपोषण करणार !

भेसळयुक्त पेढ्यांचा साठा

कोल्हापूर, १४ ऑगस्ट (वार्ता.) – जोतिबा देवस्थान हे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे वर्षभरात ७० ते ८० लाख भाविकांची उपस्थिती असते. येथील देवाला पेढ्याचा नैवेद्य प्रसाद म्हणून दाखवला जातो. येथे विक्री होणार्‍या पेढ्यांत कोणते घटक समाविष्ट आहेत ? पेढा किती दिवसांत वापरण्यास योग्य आहे ? ही माहिती खोक्यावर आणि तत्सम वेष्टनावर लिहिणे कायदेशीररित्या बंधनकारक असतांनाही याची माहिती कुणालाही नाही. यातील काही पेढे हे भेसळयुक्त असून त्याची राजरोसपणे विक्री केली जाते. या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासन अन् जिल्हा प्रशासन यांच्याकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. भेसळयुक्त पेढे आणि कलाकंद भाविकांच्या आरोग्यास घातक ठरत असून याविषयी प्रशासन उदासीन असून मी जोतिबा डोंगरावर आमरण उपोषण करणार आहे, अशी माहिती वाडी-रत्नागिरी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. सुनील नवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१. विक्री असणारे पेढे हे खाण्यास योग्य आहेत कि नाहीत, याची चौकशी होत नाही अथवा त्याचे उत्तरदायी यंत्रणेच्या वतीने नियमितपणे परीक्षण होत नाही. केवळ कागदोपत्री परीक्षणाचा फार्स केला जातो.

२.  येथे न्यूनतम २ ते ३ टन पेढा विकला जातो. हा पेढा कुठून येतो, याची माहिती विक्रेते सांगत नाहीत.

३. रस्त्यावर बसून उघड्यावर पेढे विकले जातात. आजपर्यंत कधीही नियमितपणे अशा ठिकाणांची खाद्यपदार्थांची पडताळणी झालेली नाही.

४. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कार्यकारिणी यांनी बर्‍याच वेळा दूषित पेढे विक्री होऊ नयेत; म्हणून विविध पातळीवर प्रयत्न केले आहेत; परंतु याची संबंधित यंत्रणेने कधीही नोंद घेतलेली नाही. दूषित आणि भेसळयुक्त पेढे विक्रीचे रॅकेट जोतिबा देवस्थान परिसरात कार्यरत झाले आहे. हे अवैधपणे व्यापार करणारे विक्रेते प्रामुख्याने जोतिबाच्या बाहेरचे आहेत. हे दूषित आणि भेसळयुक्त पेढे अन् अन्नपदार्थ खाल्ल्याने, जर विषबाधा झाली अथवा आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली, तर अशा वेळी हे विक्रेते शोधणे अडचणीचे आहे.

५. या संदर्भात मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यावर अनेक वेळा विक्रेत्यांनी माझ्या अंगावर धावून येणे, यात्रा समितीच्या बैठकीत उडवा-उडवीची उत्तरे देणे असे प्रकार होत आहेत. २ वर्षांपूर्वी ही गोष्ट मी अन्न आणि औषध प्रशासनास निदर्शानास आणून दिल्यावर २ टन पेढे जप्त झाले. इतकी मोठी घटना झाल्यावरही कोणतीही फौजदारी स्वरूपाची कारवाई झालेली नाही. त्यामुळे पेढे विक्रेते नेहमीच असा गुन्हा परत परत करत आहेत.