छत्तीसगडमधील प्रकरणावरून लोकांमध्ये भीती निर्माण करू नका, गोव्यात अल्पसंख्यांक सुरक्षित ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

भाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांकांना धोका असल्याचा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आरोप केल्याचे प्रकरण

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, ४ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात समान नागरी कायदा लागू आहे. गोव्यात अल्पसंख्यांकांवर अन्याय केला जात नाही आणि असे कधी होणारही नाही. छत्तीसगड येथील घटनेवरून लोकांमध्ये भीती निर्माण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ४ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तर तासाच्या प्रारंभी केले. छत्तीसगड येथे धर्मांतर आणि मानवी तस्करी करणे या आरोपाखाली केरळमधील २ नन्सना कह्यात घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांकांना धोका असल्याचा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आरोप केला होता. या आरोपाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.

प्रारंभी छत्तीसगड येथील घटनेवरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, ‘‘गोव्यातही काही जण छत्तीसगडसारखा प्रकार करण्याची शक्यता वाटते. छत्तीसगड येथील पुनरावृत्ती गोव्यात होणार नाही, याची हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी द्यावी.’’

संपादकीय  भूमिका 

भाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांक सुरक्षित आहेत; पण काँग्रेस, तृणमूल आणि साम्यवादी यांचे सरकार असलेल्या कर्नाटक, बंगाल अन् केरळ या राज्यांत हिंदू असुरक्षित आहेत !