Road Accidents : मागील ६ महिन्यांत राष्ट्रीय महामार्गांवर २७ सहस्रांहून अधिक जणांचा मृत्यू ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी देहली – चालू वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये २६ सहस्र ७७० जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली.

गडकरी यांनी राज्यसभेला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या ५२ सहस्र ६०९ इतकी होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देहली-मेरठ द्रुतगती मार्ग, ‘ट्रान्स-हरियाणा’, ‘इस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वे’, देहली-मुंबई द्रुतगती मार्ग अशा मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग अन् राष्ट्रीय द्रुतगती मार्ग येथे प्रगत वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यात आली आहे.

जुनी वाहने मोडीत काढण्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाचा !

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात अर्थात् ‘नॅशनल कॅपिटल रिजन’ (एन्.सी.आर्) मध्ये जुन्या वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने नव्हे, तर राष्ट्रीय हरित लवादाने घेतला होता, असे गडकरी यांनी अन्य एका प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये सांगितले. ‘सरकारच्या वाहन मोडीत काढण्याच्या धोरणामध्ये १५ वर्षे जुनी वाहने वापरण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाचा समावेश नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले. हरित लवादाने वर्ष २०१५ मध्ये दिलेल्या आदेशाचे पालन करत एन्.सी.आर्.मध्ये १० वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहने आणि १५ वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल वाहने न चालवण्याच्या निर्णयाचे पालन केले जावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.