महाराष्ट्र विधानभवनातील प्रशासकीय कक्षांतील सुविधांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन

अपुऱ्या कपाटांमुळे कक्ष, गॅलरी, जिने आदी ठिकाणी कागदपत्रांचे ढिग !

श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी

विधीमंडळ हे राज्याच्या प्रशासकीय कामकाजाचे मुख्य केंद्र ! ही वास्तू राज्याच्या प्रतिष्ठेचे केंद्र आहे ! त्याचा दर्जा राखला न जाणे, हाच विधीमंडळाचा अवमान ठरील !

मुंबई : कामकाजाची फलनिष्पत्ती वाढावी, यासाठी एकीकडे राज्यशासन १०० दिवसांचे उद्दिष्ट निश्चित करून प्रशासनाला प्रोत्साहन देत आहे: मात्र प्रशासकीय कामकाजाचे नियमन करणाऱ्या विधानभवनात कार्यरत प्रशासकीय विभागांतील आवश्यक सोयी-सुविधांकडे विधीमंडळ प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

विधानभवनाच्या विविध समित्यांतील काही कक्ष कागदपत्रांनी अक्षरशः भरले आहेत. काही कार्यालयांत कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आसंद्यांवरील (खुर्च्यांवरील) कापड फाटले आहे. काही ठिकाणी पटल (टेबल) अल्प आहेत, तर काही कक्षांत विजेच्या दिव्यांची समस्या आहे. संबंधित विभागाकडून याविषयीची व्यवस्था पहाणाऱ्या बांधकाम विभागाला कळवूनही या कक्षांना आवश्यक साहित्य वेळच्या वेळी दिले जात नाही. याविषयी माहिती घेऊन विधीमंडळ प्रशासनाने कक्ष नीटनेटके रहाण्याकडे आणि कामकाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

एका समितीच्या कक्षात इतरत्र ठेवण्यात आलेले कागदपत्रांचे ढिग. अशा प्रकारे अन्यही काही कक्षात अशा प्रकारे कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत.
एका मजल्यावर लिफ्टच्या बाहेरील जागेत रचलेले कागदपत्रांचे ढिगारे (अशा प्रकारे अन्य मजल्यांवरील लिफ्टच्या बाहेर अशा प्रकारे कागदपत्रांचे ढिगारे आहेत)
श्री. प्रीतम नाचणकर

विधीमंडळ हे राज्याच्या प्रशासकीय कामकाजाचे मुख्य केंद्र आहे. ही वास्तू राज्याच्या प्रतिष्ठेचे केंद्र आहे.

राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांनी आदर्श घ्यावा, अशी या वास्तूमधील व्यवस्था असावी.

विधानभवनातील स्थितीचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी या वृत्तामध्ये छायाचित्रे देण्यात आली आहेत. यात विधीमंडळाच्या अवमानाचा कोणताही हेतू नाही. उलट विधीमंडळासारख्या प्रतिष्ठित वास्तूचा दर्जा राखला न जाणे, हाच विधीमंडळाचा अवमान ठरील !

काही महिन्यांपासून विधानभवनाच्या नूतनीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे काही प्रमाणात इमारतीमध्ये साहित्य इतरत्र ठेवण्यात आले आहे. काही कक्षांचे नूतनीकरणही करण्यात आले आहे: मात्र अनेक गोष्टी वर्षानुवर्षे अव्यवस्थित दिसत आहेत. त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

फित, ध्वनीमुद्रक आणि ध्वनीयंत्रणा चालक कक्षाचे गोदामात रूपांतर
एका मजल्याच्या बाहेरील जिन्याच्या कोपर्‍याचा कचरा ठेवण्यासाठी उपयोग, तुटलेली कपाट (अन्य प्रकारे अन्य मजल्यांच्या जिन्यांवर मोडलेली कपाटे आहेत, कचरा ठेवला आहे)
एका मजल्यावर मध्येच टाकलेले अहवाल

प्रशासकीय कक्ष सुव्यवस्थित रहावेत !

विधानभवनाच्या इमारतीच्या तळमजल्यावर मुख्यमंत्र्यांचे दालन, राजकीय पक्षांची कार्यालये, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यांवरील मंत्र्यांची दालने, तिसऱ्या, चौथ्या अन् पाचव्या मजल्यांवरील राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये फर्निचर (लाकडी साहित्य) व्यवस्थित आहे. १८ ते २० व्या मजल्यांवर विविध राजकीय पक्षांच्या पक्षप्रतोदांची दालने, तसेच विधीमंडळाच्या विविध समित्यांच्या प्रमुखांची दालने आहेत. अशी सर्व लोकप्रतिनिधींची दालने नीटनेटकी ठेवण्यात आली आहेत. तेथे चांगल्या आसंद्या, कपाटे, पटल आदी व्यवस्था चांगल्या प्रकारे आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून तसेच राज्याची मुख्य प्रशासकीय वास्तू म्हणून या गोष्टी आवश्यक आहेतच; परंतु यासह विधीमंडळातील प्रशासकीय कक्ष सुव्यवस्थित रहावेत, यासाठी लक्ष देणे आवश्यक आहे.

सर्वत्र कागदपत्रांचे ढीग !

एका मजल्यावर कक्षाच्या बाहेरील कागदपत्रांचे ढिगारे

काही मजल्यांवरील कक्ष कागदपत्रांनी भरून गेले आहेत. पुरेशी कपाटे नसल्यामुळे कक्षातील पटलांवर कागदपत्रांचे ढिगारे रचण्यात आले आहेत. पटलही कागदपत्रांनी भरल्यामुळे कक्षात इतरत्र लादीवर कागदपत्रांचे ढिग लावण्यात आले आहेत. कक्ष कागदपत्रांनी भरल्यामुळे काही कक्षांबाहेरील गॅलरीमध्ये लाकडाचे रैंक ठेवून त्यात कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत. बाहेरील रॅकही भरल्याने गॅलरीतील लाद्यांवर कागदपत्रांचे ढिग ठेवण्यात आले आहेत.

एका कक्षाच्या बाहेरील गॅलरीत पिशव्यांमध्ये ठेवलेली जीर्ण कागदपत्रे
एका मजल्यावर लिफ्टच्या बाहेर अस्ताव्यस्त ठेवलेले कागदपत्रे

काही मजल्यांवर तर उद्वानहनाच्या बाहेरील जागेतही कागदपत्रांचे ढिग रचण्यात आले आहेत. काही मजल्यांवर जिन्यांच्या कोपऱ्यांमध्ये कागदपत्रे मोठ्या पिशव्यांमध्ये भरून ठेवण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी असलेली बहुतांश कागदपत्रे अक्षरशः धुळीने माखलेली आहेत. यापुढे सर्व कागदपत्रांचे ‘स्कॅनिंग’ केले जाणार आहे; मात्र एकाच अहवालांच्या किती प्रती ठेवाव्यात ?, अतिरिक्त प्रींचे काय करावे?, कक्षातील कागदपत्रे ठेवण्यासाठी आवश्यक कपाटांची व्यवस्था कशी करावी?, या गोष्टींकडे विधीमंडळ प्रशासनाने ‘पालक’ म्हणून लक्ष द्यायला हवे, असे बोलले जत आहे.

कागदपत्रे गॅलरीत नकोत; अन्य दुरुस्तीकामे करण्याची सूचनाही बांधकाम विभागाला देणार ! – जितेंद्र भोळे, सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ

श्री. जितेंद्र भोळे

कागदपत्रे विधानभवनातील कक्ष आणि त्यांच्या बाहेर कागदपत्रे अस्ताव्यस्त ठेवली जातात, हे सत्य आहे. कागदपत्रे कक्षाबाहेरील मोकळ्या जागेत न ठेवण्याविषयी परिपत्रक काढण्यात आले आहे. सध्या सर्व रेकॉर्ड ऑनलाईन उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कागदपत्रांचे ‘स्कैनिंग’ करण्यात येत आहे. ते पूर्ण व्हायला साधारण ६ महिने लागतील. स्कैनिंग पूर्ण झाल्यावर आम्ही जुनी कागदपत्रे काढून टाकणार आहोत. कर्मचाऱ्यांच्या आसंधा, तसेच विजेच्या दिव्यांची दुरुस्ती आदींना विलंब होत आहे. असे व्हायला नको. आम्ही गाविषयी बांधकाम विभागाला सूचना देऊ. विधानभवनाच्या नूतनीकरणाचे काम चालू आहे. आतापर्यंत खालील ३ मजल्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. वरील मजल्यांचे नूतनीकरण टप्प्याटप्प्याने केले जाईल.

अधिकाऱ्यांशी संवाद साधून ‘सनातन प्रभात’ ने जाणून घेतली स्थिती !

याविषयी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने विविध मजल्यांवरील कक्षांतील अधिकाऱ्यांची भेट घेऊन स्थिती जाणून घेतली. या वेळी त्यांनी पुढील सूत्रे सांगितली.

१. कागदपत्रे ठेवण्यासाठी कपाटांची आवश्यकता असून कपाटांची मागणी करण्यात आली आहे; मात्र अद्याप ती उपलब्ध झालेली नाहीत. हे सूत्र ३-४ कक्षांतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

२. एका कक्षातील अधिकाऱ्यांनी बंद पडलेला विजेचा दिवा पालटण्याची, तसेच नायलॉनची फाटलेली आसंदी पालटण्याची मागणी बांधकाम विभागाकडे करून अनेक महिने झाले; परंतु अद्यापही विजेचा दिवा आणि फाटलेली आसंदी पालटलेली नाही. (अन्यही काही कक्षांमधील आसंद्या फाटलेल्या दिसून आल्या, तर काही मजल्यांच्या बाहेर अतिरिक्त आसंद्या रचून ठेवण्यात आल्या आहेत.)

३. एका कक्षातील अधिकाऱ्याने ‘अधिवेशन असल्यामुळे कागदपत्रे लाद्यांवर काढलेली आहेत, तसेच कागदपत्रांचे वर्गीकरण चालू आहे’, असे सांगितले. ‘आवश्यक पदे भरण्यात न आल्यामुळे मनुष्यबळाची अडचण येत आहे’, असेही त्याने सांगितले.

कक्षांमध्ये काय हवे-नको ?, हे पहाण्याची पद्धत बंद !

‘पूर्वी बांधकाम विभागाकडून प्रत्येक कक्षातील व्यवस्थेची पहाणी करण्याची पद्धत होती. त्यामुळे कक्षातील छोटी-छोटी कामे मार्गी लागत होती. काही वर्षांपासून मात्र ही पद्धत बंद झाली आहे’, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.