भारत आणि इस्रायल यांच्या समोरील आव्हाने तुलनात्मकदृष्ट्या !

पहेलगाममध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. या युद्धाचे विश्लेषण करतांना ज्येष्ठ संरक्षणतज्ञ प्रा. ब्रह्मा चेलानी यांनी असे मत मांडले, ‘भारताने इस्रायलप्रमाणे पाकिस्तानची हवाई यंत्रणा आणि क्षमता पहिल्याच आक्रमणात नष्ट करणे आवश्यक होते; परंतु भारताने ते केले नाही आणि इस्रायलने नेमके केले. त्यामुळे इराणची आक्रमण करण्याची क्षमता पूर्णतः नष्ट केली.’

प्रा. ब्रह्मा चेलानी यांनी मांडलेले सूत्र वरकरणी जरी योग्य आणि महत्त्वपूर्ण वाटत असले, तरी प्रत्येक घटना अन् निर्णय हा स्थळ, काळ, तसेच तत्कालीन परिस्थिती यांनुसार योग्य-अयोग्य ठरत असतो. त्यामुळे अन्य सूत्रांचा अभ्यास करणे आणि त्यादृष्टीने निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे.

भारत आणि इस्रायल

१. इथे महत्त्वाचे सूत्र, म्हणजे भारतीय सैन्य अधिकार्‍याने आपली विमाने नष्ट झाल्याचे म्हटले आहे आणि एक राष्ट्राभिमानी भारतीय म्हणून आपल्या सैन्यावर अन् सैन्य अधिकार्‍यांच्या शब्दांवर विश्वास असणे अत्यंत क्रमप्राप्त, तसेच आवश्यक आहे.

अधिवक्ता अनेश परळकर

२. भारताला केवळ पाकिस्तानशीच लढायचे नसून चीन, बांगलादेश (जो वर्ष १९७१ पासून आपला एक नवीन शत्रूराष्ट्र म्हणून उदयास आलेला देश आहे, जे आपल्या शासनकर्त्यांना फार उशिरा कळले) हे बाह्य शत्रू आणि देशांतर्गत असलेले कथित पुरोगामी, साम्यवादी, पाकिस्तान समर्थक, कथित समाजसुधारक, जनमानसावर प्रभाव असलेली हिंदी चित्रपटसृष्टी, त्यांचे अनुकरण करणारी मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्हीवरील मालिका या सर्व विरोधकांशी लढावे लागत आहे. हे सर्व घटक भारताचे कडवे विरोधक आहेत आणि त्यांच्याशी लढणे, हे फार मोठे जिकिरीचे कार्य असल्याची प्रा. ब्रह्मा चेलानी यांना निश्चितच कल्पना असणार आहे.

३. इस्रायलमध्येही स्थानिक राष्ट्रद्रोही आहेतच; परंतु तो त्यांच्या विरोधात कठोर पावले उचलून त्यांना नेस्तनाबूत करतो, तसे आपल्याकडे करणे कठीण जाते; कारण आपले पुष्कळ मनुष्यबळ विरोध मोडून काढण्यासाठी वापरले जाते. उदा. इस्रायलमध्ये रस्त्यावर नमाज पढण्याकरता बसलेल्या धर्मांधांना कायद्याचे पालन करून उठवले जाते. याउलट नवी देहली येथे अशाच प्रसंगी धर्मांधांना कायद्याचे पालन करावयास लावणार्‍या पोलीस उपनिरीक्षकास निलंबित केले गेले.

४. भारतात आणि महाराष्ट्रात हिंदुत्वनिष्ठ म्हणणार्‍या पक्षांचे सरकार आहे; परंतु त्यांच्या हाताखाली कार्यरत असलेली व्यवस्था ही साम्यवाद्यांच्या प्रभावाखाली असल्याचे कित्येक तज्ञांचे मत आहे.

५. पाकिस्तानने आपल्यावर अनेक आक्रमणे केली; परंतु आपण आक्रमक धोरण स्वीकारलेले नव्हते; परंतु आताच्या केंद्र सरकारने पाकिस्तानसमवेतचा ‘सिंधू जल करार’ स्थगित करणे, पाकिस्तानचा ‘मोस्ट फेव्हरेट नेशन’ (सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र) हा दर्जा रहित करणे, पाकिस्तानी कलाकारांना कार्यक्रमासाठी प्रवेश नाकारून त्यांचे आर्थिक कंबरडे मोडणे, असे वर्ष २०१४ पूर्वीच्या सरकारने न घेतलेले कठोर निर्णय आता घेतले.

भारताने पाकिस्तानविषयी स्वीकारलेले आक्रमक राष्ट्रवादाचे धोरण हे सर्वसामान्यांना दिसत आहे. ते प्रा. ब्रह्मा चेलानी यांनाही ज्ञात असणारच. मग त्यांनी असा विषय मांडून नक्की काय साध्य केले ?, हे त्यांनी स्पष्ट करायला हवे.

– अधिवक्ता अनेश परळकर, मुंबई. (२४.६.२०२५)