कोरोनाचे मुंबईत ३०, तर राज्यात ६८ नवे रुग्ण

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – देशात कोरोना महामारी वाढत असून त्यामुळे २ दिवसांत देशात २१ जण मृत्यूमुखी पडल्याने आता हा आकडा २८ वर गेला आहे. कोरोनाचे मुंबईत नवे ३० रुग्ण आणि राज्यात नवे ६८ रुग्ण आढळले आहेत, तर देशात कोरोना महामारीचे ३ सहस्र रुग्ण झाले आहेत.

पुण्यात २, पिंपरी-चिंचवड महापालिकेत १५, ठाणे ग्रामीणमध्ये २, ठाणे महापालिकेत ८, कल्याण-डोंबिवलीत १, रायगडमध्ये २, तर नागपूर येथे १ नवीन रुग्ण आढळला आहे.

वसईच्या नायगाव परिसरातील रहिवाशाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे. ५ दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या देशात ५ पटीने वाढली आहे.

सातारा– जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी दिली. शहरात अडीच वर्षांनंतर कोरोनाचे २ रुग्ण आढळून आले आहेत.  ते पुढे म्हणाले की, जिल्हा रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि इतर व्यवस्था आहे, तसेच आवश्यक ती सर्व औषधे उपलब्ध आहेत. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी २० खाटांचा स्वतंत्र अतीदक्षता विभाग सिद्ध करण्यात आला आहे. तिथे सर्व यंत्रणा सिद्ध ठेवण्यात आली आहे.