भारताला बौद्धिक क्षात्रधर्म जागवणार्‍या छत्रपती शिवरायांची आवश्यकता !

  • प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचे मार्गदर्शन

  • पुणे येथे अभिजित जोग लिखित ‘भारत- सत्य, सत्त्व, स्वत्व’ या पुस्तकाचे प्रकाशन !

डावीकडून श्री. मधुर बर्वे, श्री. शरद ढोले, प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, श्री. श्याम जाजू, डॉ. नीलेश ओक आणि श्री. अभिजित जोग

पुणे – गेली २०० वर्षे आपल्या स्मृती पुसून टाकण्याचे प्रयोग झाले, त्यामुळे आपली ओळख नक्की कोणती ? हा प्रश्न पडतो. आज सत्यान्वेषी लोकांचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. नाहीतर काल-परवा जे बांगलादेशात घडले, बंगालमध्ये जे नमुना म्हणून घडत आहे, ते पुण्यात घडायला वेळ लागणार नाही. त्यासाठी आपल्यातील ‘शिवचैतन्य’ जागृत करण्याची आवश्यकता आहे. मानवजातीला सुखी ठेवायचे असेल, तर भारताचा धर्मविचार टिकायला हवा.

दीपप्रज्वलन करतांना पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांनी याच संस्कृतीच्या संरक्षणासाठी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. आज राष्ट्ररक्षणासाठी बौद्धिक क्षात्रधर्म जागवणार्‍या छत्रपती शिवरायांची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी केले. श्री. अभिजित जोग लिखित ‘भारत -सत्य, सत्त्व, स्वत्व’ या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ‘गोखले इन्स्टिट्यूट’च्या काळे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते मार्गदर्शन करत होते.

श्री. अभिजित जोग

पुस्तकाचे लेखक म्हणून मनोगत व्यक्त करतांना जोग म्हणाले की, ओळख हरवलेल्या राष्ट्रांचे अस्तित्व संपते. दुर्दैवाने भारताच्या संदर्भात हेच घडले. ब्रिटिशांनी राष्ट्र म्हणून भारताचे अस्तित्व नाकारले होते; मात्र ऋग्वेद काळापासून भारत एक राष्ट्र आहे. भारताच्या खर्‍या ओळखीचा शोध घेणारे हे पुस्तक आहे.

सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता हे भारताचे अविभाज्य अंग असून त्याच्या पुनर्निर्माणाची संधी आली, तेव्हा आपण करंटे ठरलो, असे भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू म्हणाले. ‘इंडिया’ला भारत समजून घ्यायचा असेल, तर हे पुस्तक उत्तम असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘अखिल भारतीय धर्म जागरण प्रमुख’ ढोले यांनी सांगितले. भारताला स्वतःचा वैचारिक लढा देण्यासाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरील, असे मत संशोधक आणि लेखक डॉ. नीलेश ओक यांनी व्यक्त केले.