आतंकवाद संपवायचा असेल, तर पाकिस्तानचे अस्तित्व संपवणे आवश्यक ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

पणजी, २८ मे (वार्ता.) – आतंकवाद संपवायचा असेल, तर पाकिस्तानचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी केले. पाटो, पणजी येथील धन्वंतरि प्रतिष्ठानकडून २७ मे या दिवशी आयोजित ‘ऑपरेशन सिंदूर : भारताची भूमिका आणि वाटचाल’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा संघचालक श्री. राजेंद्र भोबे आणि धन्वंतरि प्रतिष्ठानच्या संस्थापिका वैभवी देसाई हे व्यासपिठावर उपस्थित होते.

ब्रिगेडियर महाजन पुढे म्हणाले, ‘‘ऑपरेशन सिंदूरनंतर आतंकवाद संपला’, असे म्हणता येणार नाही; कारण नीच दर्जाचा हा आतंकवाद चालूच राहील. २२ एप्रिल या दिवशी पहलगाम येथे २६ हिंदू पर्यटकांना मारण्यात आले; परंतु त्या आतंकवाद्यांना पकडण्यात आपल्याला यश आले नाही. काश्मीरमध्ये पर्यटकांचे प्रमाण वाढत आहे. तिथे निसर्गसौंदर्य भरपूर असूनही हवी तशी सुरक्षा नाही. जेव्हा आक्रमण झाले, तेव्हा पोलिसांना १ घंट्याच्या आत बोलावता आले असते; परंतु पोलीस तिथे पोचले नाहीत. पाकिस्तानशी लढाई करतांना केवळ पाकिस्तान नव्हे, तर त्याला सहकार्य करणार्‍या किंवा पाठिंबा देणार्‍या चीनसारख्या देशांच्या विरोधात लढत आहोत, याचे भान हवे. भारतात अनेक हस्तक आहेत, जे चीन आणि पाकिस्तान यांच्याशी निगडित आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर आतंकवादी पकडले गेले नाहीत; कारण चीनने त्यांना तांत्रिकदृष्ट्या पुष्कळ साहाय्य केले.

भारताने पाकिस्तानशी आर्थिक स्तरावर युद्ध केले, तसेच जलयुद्ध केले. भारताने पाकिस्तानचा ५ कोटी रुपयांचा व्यापार बंद केला. ज्यामध्ये दैनंदिन वस्तूंचा समावेश होता. सध्या पाकिस्तानला दैनंदिन वस्तू दुबईहून तिप्पट किमतीत घ्याव्या लागत आहेत. भारतावर आक्रमण करण्यासाठी पाकिस्तानने कर्ज घेऊन सिद्धता केली. पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी युद्धाचा आढावा सकारात्मक न देता भारताच्या विरोधात प्रसिद्ध केला. या प्रसारमाध्यमांनी भारताची बाजू कधीच घेतली नाही. वर्तमानपत्रांचे ३० टक्के भांडवल हे चीन आणि इतर देशावर अवलंबून असल्याने ही प्रसारमाध्यमे भारताच्या विरोधात आहेत. भारताला महासत्ता बनवण्यासाठी भारतियांनी शिस्तप्रिय होणे आवश्यक आहे. कुठलीही भारतविरोधी ‘पोस्ट’ दिसली, तर त्याची तक्रार किंवा लिंक पोलिसांकडे पाठवणे आवश्यक आहे.’’

या वेळी श्री. राजेंद्र भोबे म्हणाले, ‘‘आपल्या देशाची सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती आणि नागरिकांची मनोवृत्ती यांची सांगड घातली पाहिजे, तरच असे प्रसंग टळतील. लव्ह जिहाद, लँड जिहाद यांसारखे प्रश्न देशासमोर ‘आ’वासून उभे आहेत. आपली हिंदु समाज म्हणून अस्तित्वाची लढाई आहे. एकजुटीने कार्य करण्याच्या गतीमध्ये हिंदु समाज मागे पडत आहे.’’