बलुचिस्तानमध्ये भारतातून बाँब किंवा लोक येत नाहीत, तर आक्रमण करणारे आपलेच लोक आहेत ! – Pakistan Senator Umar Farooq

पाकिस्तानचे खासदार उमर फारूख यांचा देशाला घरचा अहेर !

पाकिस्तानचे खासदार उमर फारूख

इस्लामाबाद (पाकिस्तान) – बलुचिस्तानमध्ये आपल्या सुरक्षायंत्रणा आणि सैन्य काय करत आहेत ? आपण आपल्याच सैन्यावर प्रश्न का उपस्थित करत नाही ? भारतातून कोणतेही बाँब किंवा लोक येत नाहीत. बलुचिस्तानमध्ये आक्रमण करणारे आपलेच लोक आहेत, अशा शब्दांत पाकिस्तानचे खासदार उमर फारूख यांनी पाकच्या संसदेत बोलतांना घरचा अहेर दिला.

‘बलुचिस्तानमध्ये लोकांना अटक केली जात आहे, जे अंतर्गत असंतोष आणि दडपशाही दर्शवते’, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

भारत पाकमध्ये इतक्या खोलवर घुसून आपल्याला कसा मारू शकतो ?

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वरूनही उमर फारूख यांनी पाकची सुरक्षा आणि गुप्तचर संस्था यांवर टीका केली. ते म्हणाले की, भारत पाकमध्ये इतक्या खोलवर घुसून आपल्याला कसा मारू शकतो ? भारताने वायूदलाने चकलाला तळावर बाँबफेक केली. आमच्या सैन्याचे मुख्यालय जवळच होते. ‘भारत इतक्या खोलवर कसा घुसला ?’ हे कुणीही विचारत नाही. जर माझ्या बोलण्यावर कुणी रागावले असेल, तर त्याने थेट येऊन या सूत्रांवर माझ्याशी चर्चा करावी, असे आव्हानही फारूख यांनी या वेळी दिले.