महाराष्ट्रात ४ मासांत १ सहस्र शेतकर्‍यांच्या आत्महत्या ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

मुंबई – जानेवारी २०२५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ५४ सहस्र ५३३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे या कालावधीत १ सहस्र शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २१ मे या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. बाधित क्षेत्राचे पंचनामे तातडीने करून हानीग्रस्त शेतकर्‍यांना सरकारने हानीभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

अंबादास दानवे पुढे म्हणाले की, मार्च २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या हानीपोटी शेतकर्‍यांना एकूण १३ सहस्र ८१९ कोटी रुपये अद्याप वाटप झालेले नाहीत. पीक कापणी प्रयोगावर आधारित या एकाच निकषावर सरकार पीक विम्याची एकदाच भरपाई देणार आहे, हे अन्यायकारक असून याविरोधात आवाज उठवण्यात येईल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यावरही परळी येथे शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. यामुळे तेथील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अंबादास दानवे

ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला वर्ष २०२३-२४ मध्ये ३६ सहस्र कोटी मिळाले होते. आता वर्ष २०२४-२५ मध्ये ३१ सहस्र ८३० कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे डबल इंजिन सरकारला केंद्राची साथ खरी मिळते का ? सुरक्षा आणि उपाययोजना यांवर ताशेरे ओढतांना दानवे म्हणाले की, सोलापूर औद्योगिक वसाहत येथे लागलेल्या आगीत घायाळ झालेल्यांना रुग्णालयात नेण्यासाठी पंढरपूर येथून रुग्णवाहिका आणावी लागली. जनतेचा विरोध असतांनाही विविध विकास कामांच्या नावाखाली सामान्य नागरिक आणि शेतकरी यांच्या भूमी अधिग्रहण करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू असून गुत्तेदारांचे साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे, असा आरोप त्यांनी केला.