Manoj Naravane : युद्ध म्हणजे प्रणयरम्य चित्रपट नसून अतिशय गंभीर सूत्र आहे ! – जनरल मनोज नरवणे (निवृत्त), माजी भारतीय सैन्यदलप्रमुख

माजी भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज नरवणे

पुणे – युद्ध म्हणजे काही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रणयरम्य (‘रोमँटिक’) चित्रपट नाही. युद्ध हे अतिशय गंभीर सूत्र आहे. युद्ध किंवा हिंसाचार हा शेवटचा उपाय असावा; म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हा युद्धाचा काळ नाही. काही मूर्ख लोक आपल्यावर युद्ध लादतील, तरीही आपण ते साजरे करू नये, असे विधान माजी भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज नरवणे (निवृत्त) यांनी केले आहे. भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या आणि पाकिस्तानविरुद्ध पूर्ण युद्ध छेडण्याचा सल्ला देणार्‍यांवर त्यांनी अशा स्वरूपात टीका केली आहे. येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘जर मला आदेश मिळाला असता, तर मी निश्चितच युद्धभूमीवर गेलो असतो; परंतु राजकीय चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवणे ही माझी प्राथमिकता आहे. लढाईमुळे सीमावर्ती भागांत रहाणार्‍या लोकांना धक्का बसला आहे. लहान मुलांना बाँबस्फोटामुळे बंकरमध्ये रात्री घालवाव्या लागत आहेत. युद्धात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांचे आघात आता पिढ्यान्‌पिढ्या कायम रहातील. ‘पी.टी.एस्.डी.’ (‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर’) नावाच्या समस्येमुळे पीडितांना २० वर्षांनंतरही भीती आणि चिंता वाटत रहाते. अशा लोकांना अनेकदा मानसोपचारतज्ञांचे साहाय्य घ्यावे लागते.’’