‘कॉपीमुक्त परीक्षा अभियाना’मुळे १२ वी उत्तीर्णांची संख्या १.५ टक्क्यांनी घटली !

‘कॉपीमुक्त परीक्षा अभियान’

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ५ मे या दिवशी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत घोषित केला. ‘कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ राबवल्याने या वर्षीच्या निकालात १.५ टक्के घट दिसून आली. या अभियानांतर्गत विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. राज्यातील ३ सहस्र ३७३ केंद्रापैकी ८१८ केंद्रावर संचालक, पर्यवेक्षक आहे आणि परीक्षेशी संबंधित व्यक्ती पालटण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, या वर्षी ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील ८ सहस्र ३५२ विद्यार्थ्यांना ९० टक्के अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कला शाखेचा निकाल ५ टक्क्यांनी घटला आहे. विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उत्तीर्णांचे प्रमाण पालटलेले नाही. व्यवसाय अभ्यासक्रम ८३.२६ टक्के, आयटीआय ८२.०३ टक्के निकाल लागला. सलग १४ व्या वर्षी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक आहे.