Quick Fly Amravati to Mumbai : अमरावती-मुंबई विमानप्रवास केवळ पावणे २ घंट्यांत !

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन !

अमरावती : अमरावती विमानतळ १६ एप्रिलपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. याआधी येथील विमानतळाची सेवा विशेष महनीय व्यक्तींसाठीच होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले. रेल्वेने अमरावतीहून मुंबईला यायला १२ घंटे लागतात. या विमानसेवेमुळे हे अंतर केवळ पावणे २ घंट्यांचे होणार आहे.

१. अमरावती विमानतळाची निर्मिती वर्ष १९९२ मध्ये झाली होती. तेव्हापासून हे विमानतळ केवळ विशेष महनीय व्यक्तींसाठीच चालू होते.

२. या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १ सहस्र ८५० मीटर असून ४५ मीटर रुंद आहे. याच विमानतळावर आशिया खंडातील सर्वांत मोठ्या एअर इंडियाचे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे. ऑक्टोबर २०२५ पासून या विमानतळावरून रात्रीच्या वेळीही विमानसेवा चालू राहील.

३. या विमानसेवेमुळे अमरावतीच्या दळणवळणाला चालना मिळेल. औद्योगिक विकास, तसेच कापड उद्योगही भरभराटीस येतील.

अमरावतीतील ‘वैमानिक प्रशिक्षण केंद्र’ दक्षिण आशियातील सर्वांत मोठे केंद्र असेल ! – मुख्यमंत्री

अमरावतीत ‘वैमानिक प्रशिक्षण केंद्र’ चालू होणार आहे. यामुळे अमरावतीचे नाव जगाच्या नकाशावर येईल. हे दक्षिण आशियातील सर्वांत मोठे केंद्र असेल. येथे वैमानिकांना प्रशिक्षण मिळेल, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाच्या उद्घाटप्रसंगी केले.

या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘येथे प्रशिक्षण केंद्र चालू होणार असल्याने देशाला चांगले वैमानिक आणि प्रशिक्षकही मिळतील.’’

४. हे विमानतळ उड्डाण योजनेअंतर्गत असल्याने तिकीट सर्वसामान्यांना परवडणारे आहे. दुरांतो एक्सप्रेसच्या प्रथम श्रेणी वातानूकुलित तिकिटाच्या शुल्कापेक्षा मुंबई विमान प्रवासाचे शुल्क अल्प आहे. भविष्यात मागणीनुसार तिकिटांचे शुल्क वाढू शकते.

५. आठवड्यातून ३ दिवस, म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, अशी ही विमानसेवा उपलब्ध असेल. हे विमान मुंबईवरून दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी उड्डाण करेल. अमरावतीवरून ४ वाजून ४० मिनिटांनी मुंबईसाठी मार्गस्थ होईल आणि सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी मुंबईत पोचेल.